भारतीय किनारपट्टीला धोका कमी, क्षेत्र येमेन किनारपट्टीकडे, राज्यात पावसाची उगडीप
पुणे / प्रतिनिधी :
उद्रार अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे शनिवारी सकाळी न्यून दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून, हे क्षेत्र गुजरात किनारपट्टीलगत आहे. हे क्षेत्र काही तासांनंतर किनारपट्टीपासून दूर, ओमानच्या दिशेने जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने गुजरात किनारपट्टीला याचा धोका कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्र व गोव्यातील पावसाचा प्रभाव कमी झाला असून, पुढील तीन दिवस या भागात हवामान विभागाने केवळ यलो अलर्ट दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने पाऊस कमी झाला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्हय़ांना असलेला रेड अलर्टही हटला आहे. राज्याच्या अनेक भागात काल पावसाची उगडीप होती. दिवसभरात तुरळक पावसाच्या सरी वगळता पाऊस थांबला होता. आठवडय़ाभरानंतर सूर्यनारायणाचे दर्शनही अनेक भागात झाले. पुढील दोन दिवस राज्यात तुरळक पाऊस राहणार असून, अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 18 जुलैनंतर पावसाचा प्रभाव आणखी कमी होण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंड, बिहारमध्ये पाऊस वाढणार
19 जुलैपासून पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उद्रार प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल तसेच पूर्वोत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा : पण, आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच..