पुणे / प्रतिनिधी :
शेतमाल हमीभाव कायदा करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्या, यासह विविध मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक हन्नान मौला यांनी ही माहिती दिली.
हन्नान मौला म्हणाले, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, प्रजासत्ताकदिनी जिल्हास्तरावरील सरकारी कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. याच दिवशी हरियाणातील जिंद येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात येईल. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीत करावयाच्या आंदोलनाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करण्यात येईल.
शेतीयोग्य जमिनीचे भूसंपादन करू नका, लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरणी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या, नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.