उत्तराखंडमधील टिहरी या जिल्हय़ात काही गावांमध्ये पडिक जमिनीचे प्रमाण मोटे आहे. मात्र, आज यातील काही पडिक जमीन सुजलाम सुफलाम बनली आहे. सुपीक जमिनीलाही लाजवेल, असे पीक या जमिनीत येत आहे. ही किमया सुशांत उनियाल आणि प्रकाश उनियाल या दोन बंधूंनी साध्य करून दाखविली आहे.
हे दोन्ही बंधू उच्चशिक्षित असून दिल्लीमध्ये दोघांनाही चांगल्या नोकऱया होत्या. मात्र, नोकरीमधील त्याच त्याच स्वरुपाच्या कामाला कंटाळून त्यांनी गावची वाट धरली. प्रशासनाकडून गावातील पडिक जमीन कसण्यासाठी घेतली. तीन वर्षे परिश्रम केल्यानंतर आज या पडिक जमिनीचे रूपांतर हरित क्षेत्रात झाले आहे. या जमिनीत या दोन बंधूंनी प्रथम अळंबी उत्पादनाचा प्रकल्प सुरू केला. तो यशस्वी करून दाखविणे सोपे नव्हते. कारण या जमिनीत पाण्याची प्रचंड कमतरता होती. तरीही उपलब्ध पाण्याचा शास्त्रशुद्ध वापर करून त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. त्यानंतर जमिनीची योग्य मशागत करून आणि शेणखताचा उपयोग करून जमीन सुपीक करण्यात त्यांना यश आले आहे. गढवाल क्षेत्रातील सर्वात मोठा अळंबी प्रकल्प आज या युवकांच्या नावे आहे. त्यांना केंद्र सरकारच्या 2019 मधील मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हिल्स या योजनेंतर्गत 28 लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. आता त्यांच्या प्रकल्पाची उलाढाल जवळपास 75 लाख रुपये इतकी झाली असून त्यांनी पंचक्रोशीतील युवकांसमोर आदर्श घालून दिला आहे. आता दर महिन्याला साधारण 3 हजार किलो अळंबीचे उत्पादन ते करतात. स्थानिय बाजारपेठेप्रमाणे अन्य राज्यांमध्येही त्यांची अळंबी पोहोचली आहेत.