शहरात बिबटय़ाची दहशत कायम : वनखात्याची वाढली डोकेदुखी : कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विभागाच्या वनक्षेत्रात अलीकडे वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः वन्यक्षेत्रात वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, गवे, कोल्हे, तरस, रानडुक्कर, साळींद्र आदींच्या संख्येत वाढ झाली आहे. यापैकी बिबटय़ाने मागील चार दिवसांपासून शहरात दहशत माजविली आहे.त्यामुळे शहरवासियांमध्ये बिबटय़ाच्या वाढत्या वावराबाबत चिंता निर्माण झाली आहे. जाधवनगरमध्ये आलेल्या बिबटय़ाला पकडण्याचे आणि आता वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हान वनखात्यासमोर आहे.
बेळगाव शहरात अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. जाधवनगरमध्ये बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी उद्यमबाग परिसरात जंगली घोरपड आढळून आल्याने शहरवासियांच्या चिंतेत भर पडली. शहरात अलीकडच्या चार वर्षांत बिबटे, साळींद्र, रानमांजर, जंगली घोरपड आणि अजगर सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे.
बेळगाव विभागातील खानापूर वनक्षेत्रात घनदाट वनराई, बांबूचे अच्छादन, हिरवेगार गवत आणि बारमाही वाहणारे पाणी यामुळे ससे, रानमांजर, कोल्हे, जंगली कुत्र्यांची संख्या वाढली आहे. साहजिकच यावर उपजीविका करणाऱया बिबटय़ांची संख्या वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मानवी वस्तीत येणाऱया वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः शहर वस्तीत येणाऱया वनप्राण्यांमध्ये बिबटय़ांची संख्या अधिक आहे. दरम्यान शहरात भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. बिबटय़ाचे आवडते खाद्य कुत्रा असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ शहरात तो आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे आता पाळीव प्राण्यांबरोबर माणसांवरही हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. जाधवनगरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर नागरिक भयभीत झाले असून शहरात येणाऱया वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे काळाची गरज बनली आहे. बेळगाव विभागातील लोंढा, नागरगाळी, भीमगड, खानापूर, कणकुंबी, गोल्याळी, जांबोटी आदी घनदाट वनप्रदेशात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधार्थ सैरभैर होऊन मानवी वस्तीत येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच बेळगावच्या जाधवनगर परिसरात बिबटय़ा दाखल झाला आहे. पाळीव प्राण्यांबरोबर माणसांवर वन्यप्राण्यांनी हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. इतर वन्यप्राण्यांच्या तुलनेत हल्ला करणाऱया वन्यप्राण्यांमध्ये बिबटय़ाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बिबटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर
अलीकडे वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास वाढल्याने वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. भक्ष्याच्या शोधार्थ ते फिरत असतात. दरम्यान भक्ष्य म्हणूनच ते माणसावर हल्ले करतात. वन्यप्राण्यांच्या हालचालेंवर नजर ठेवण्यासाठी वन्यक्षेत्रात कॅमेरे बसविले आहेत. तसेच वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत, यासाठी विविध उपाय हाती घेतले आहेत.
– मलिनाथ कुसनाळ (एसीएफ, वनखाते बेळगाव)
रेसकोर्स परिसर जैवविविधतेने समृद्ध
येथील रेसकोर्स (गोल्फ मैदानाचे) क्षेत्र मोठे आहे. याठिकाणी प्राणी, पक्षी व वृक्षांची संख्या अधिक असल्याने हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. शिवाय अलीकडे याठिकाणी प्राण्यांबरोबर पक्ष्यांची संख्यादेखील वाढली आहे. या मैदानात हिरवळ आणि दाट झाडी असल्याने वेगवेगळय़ा पक्ष्यांबरोबर ससे, रानमांजरे, मोर आदींचा वावर वाढला आहे. शिवाय रेसकोर्स मैदानात भटक्मया कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळेच बिबटय़ा याठिकाणी तळ ठोकून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.