शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारत व भारतीयत्वाची ओळख करून देणारे व देशाला नवचैतन्यदायी उभारी देणारे असेल. त्याच्या यशस्वी कार्यवाहीसाठी संस्थाचालक व शिक्षक यांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे यांनी केले.
येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोव्यातही होणार आहे. त्या अनुषंगाने गोमंतक विद्या भारतीतर्फे पणजीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. या धोरणाशी संबंधित अनेक महत्वाच्या पैलूंचे सहजतेने आकलन व्हावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन मंडळांचे अध्यक्ष, संचालक सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, तसेच शिशुवाटीका संचालक यांच्यासाठी ही कार्यशाळा होती. आपल्या शैक्षणिक संस्थांची सरकारकडून कोणती अपेक्षा आहे, संस्थांनी करण्याची पूर्वतयारी, नुतनीकरण करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील बदल, शैक्षणिक व संलग्नित कार्यक्रमांचे पद्धतशीर नियोजन अशा विविध विषयांवर शिक्षणतज्ञ व या धोरणाशी निगडीत असलेले शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे व प्रा. डॉ. महेश्वर कळलावे यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
पंचकोषात्मक विकासावर भर
व्याख्यानाचे उद्दीष्ट हे आपण केवळ बौद्धिक विकासावर भर न देता पंचकोषात्मक विकासावर भर देणे ही काळाची गरज आहे, असे उपाध्यक्ष कांता पाटणेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच आपल्या प्रदीर्घ पंचकोष आधारित शिक्षण पद्धतीच्या अनेकविध अनुभवांचाही गोषवारा केला.
पहिल्या सत्रात प्रा. कळलावे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – ठळक वैशिष्टय़े व त्याचे क्रियान्वयन करण्यासाठी लागणारी संस्था पातळीवरील महत्वाची परिवर्तने यांवर अनेक उदाहरणांसह विस्तृत विचार मांडले.
गुणात्मक व व्यावसायिक शिक्षण
दुसऱया सत्रात त्यांनी शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय मानांकने तसेच जागतिक स्तरावरील आदर्श शिक्षण पद्धती व भारताची भूमिका यांवर भाष्य केले. गुणात्मक व व्यावसायिक शिक्षण संरचित अभ्यासक्रमासाठी हे धोरण कशाप्रकारे लाभदायक ठरणार आहे तेही त्यांनी स्पष्ट केले.
तिसऱया सत्रात डांगे यांनी विद्याभारतीच्या गेल्या 70 वर्षांहून अधिक यशस्वी अशा पंचकोषात्मक शिक्षण प्रणालीने संस्कारित केलेल्या अनेक पिढय़ा व त्या अनुभवांची या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी असलेली जवळीक विस्तृत व प्रभावीपणे मांडली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रुक्मा सडेकर यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमाची माहिती दिली. अध्यक्ष सुदिन नाईक यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह प्रसाद रांगणेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. शेवटच्या सत्रानंतर त्यांनीच आभारप्रदर्शन केले.