शिक्षणतज्ञ पांडुंरग नाडकर्णी यांनी व्यक्त केलेले मत, माशे येथे नवीन शैक्षणिक धोरणावर व्याख्यान
प्रतिनिधी /काणकोण
भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे ज्ञानाधिष्ठित, मूल्याधिष्ठित, कौशल्यपूर्ण शिक्षणाबरोबरच साने गुरुजींच्या बलशाली भारताची स्वप्नपूर्ती करणारे असून समाज, पालक आणि शिक्षकांसाठी देखील ते एक प्रकारचे आव्हान आहे. या नवीन धोरणाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे, असे मत शिक्षणतज्ञ आणि गोवा बोर्डाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी माशे येथे सचित मास्तर व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले. सदर व्याख्यानमालेचे हे 27 वे वर्ष असून नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर नाडकर्णी बोलत होते.
नवीन शैक्षणिक धोरणात गुणात्मक आणि दर्जात्मक शिक्षणाला महत्त्व देतानाच टय़ुशनला फाटा देण्यात आलेला आहे. अधिकाधिक शब्दकोशांचा वापर करणे, मुलांना अधिकाधिक भाषा शिकविणे, सांस्कृतिक परंपरेचे आणि पारंपरिक कलांचे शिक्षण, ओझ्याविना शिक्षण, वर्तमानपत्रांचा वापर, वाचन, लेखन याला त्यात महत्त्व देण्यात आलेले असून टीव्ही, मोबाईल, संगणकाचा वापर कसा करावा याचे ज्ञान मुलांना शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी द्यायचे आहे. मुलांना बंदिस्त जागेवर न बसविता मोकळय़ा वातावरणात सोडण्यात येणार आहे, असे नाडकर्णी यांनी सांगितले.
सरकारचा नियोजनशून्य कारभार
प्रयोगशील शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असून गोव्यात ज्यांनी शाळा सुरू केल्या त्यांनी सरकारला सहकार्य केलेले आहे. आजवर सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शिक्षणासाठी स्थापन केलेले सर्व आयोग अकार्यक्षम ठरले. वेळोवेळी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. कार्यशाळा घेण्यात आल्या नाहीत. शाळा समूह, पालक शिक्षक संघ हे कागदावरच ठेवताना पालकांना बैद्धिक शिक्षण देण्याकडे लक्ष दिले गेले नाही. पाठय़पुस्तके तयार करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याची असताना 20-25 वर्षांपूर्वी तयार केलेली पाठय़पुस्तके वापरली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
शिक्षण खात्याची पुनर्रचना करून जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर स्वतंत्र कार्यालये सुरू करून त्यांना जबाबदाऱया द्यायला हव्या होत्या. भागशिक्षणाधिकाऱयांच्या कित्येक जागा रिक्त असून त्यांच्या जबाबदाऱया वाढविलेल्या नाहीत. प्राथमिक, माध्यमिक स्तरावर शालेय तपासणी होत नाही, असे नाडकर्णी म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यापुढे बीएड् वर्ग चार वर्षांचे होतील. डीएड्पर्यंतच्या शिक्षणाला कात्री लावण्यात येणार आहे. पूर्वप्राथमिक ते 12 वीपर्यंतच्या मुलांसाठी माध्यान्ह आहाराची तरतूद असेल. दहावीच्या ऐवजी बारावीची सार्वत्रिक परीक्षा असेल. शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांच्यातील तफावत भरून काढण्यात येणार असून शिक्षण हे लोकसेवा म्हणूनच अंगिकारण्यात येणार आहे, असे सांगून नाडकर्णी यांनी 1986 ते 2020 पर्यंतच्या मागच्या 34 वर्षांतील शैक्षणिक धोरणविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
निराकार विद्यालयाला चषक प्रदान
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्री निराकार शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, श्री निराकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्वी फळदेसाई, सचित मास्तर यांचे ज्येष्ठ पुत्र भूषण प्रभुगावकर उपस्थित होते. सदर संस्थेतर्फे देण्यात येणारा दहावीच्या परीक्षेतील सर्वोत्कृष्ट निकालासाठीचा स्व. सचित मास्तर स्मृती फिरता चषक यंदा श्री निराकार विद्यालयाला प्राप्त झाला असून मुख्याध्यापिका उर्वी फळदेसाई यांनी तो नाडकर्णी यांच्या हस्ते स्वीकारला. प्रशांत नाईक यांनी स्वागत केले, तर भूषण प्रभुगावकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूनम बांदेकर यांनी केले. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत डॉ. धिलोन देसाई, कमलाकर म्हाळशी, उल्हास पै भाटीकर, जितेंद्र आमशेकर, टोनी मार्टिन्स यांनी भाग घेतला. डॉ. अमन प्रभुगावकर यांनी आभार मानले.