पुणे / प्रतिनिधी :
ओबीसी आरक्षण कायम ठेवून जातीनिहाय जनगणना करावी, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी, महागाई कमी करावी, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने येत्या 5 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाकडून बुधवारी देण्यात आला.
यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. संजय माने, जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पुणे महिला अध्यक्ष सुनीताताई किरवे, वैशाली जाधव, राजेश लवटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शासनाने सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षण कायम करावे, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी, 50 टक्के सिलिंग हटवावे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करावे, न्यायव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करावे, धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी, महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, संपूर्ण शिक्षण मोफत करावे, मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, या मागण्या मान्य करण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील जंतर- मंतर मैदानावर होणाऱ्या आंदोलनात ओबीसी समाजाने मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी केले आहे.
महादेव जानकर भाजपावर नाराज?
भाजपा नेते महादेव जानकर, हेही सध्या भाजपावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. जानकर यांचा पक्षही फोडण्यात आला. त्यात त्यांना वेळोवेळी डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीत भर पडल्याचे मानले जात आहे. दिल्लीतील आंदोलनामुळे या चर्चेला एकप्रकारे पुष्टीच मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जानकर यांची भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता असेल.
हेही वाचा : निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी, शिवेंद्रसिंहराजेंची टीका