अध्याय सत्रावा
मनुष्य कुटुंबियांबाबत फार आसक्त असतो. त्यामुळे तो त्यांच्यात तन मनाने गुंतलेला असतो. त्याबद्दल भगवंत सांगतात की, आपली आणि त्यांची योगायोगाने या जन्मापूरती गाठ पडलीये असं लक्षात घेऊन त्यांच्याबाबत कर्तव्यपूर्ती केल्यावर बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता बाजूला व्हावं म्हणजे त्यांच्याबद्दलच्या आसक्तीतून माणसाची सुटका होईल. याबाबत सविस्तर सांगताना भगवंत म्हणाले, झाडाखाली ज्याप्रमाणे पांथस्थ लोक क्षणभर एकत्र जमतात. त्याप्रमाणे बायकामुले व आप्तइष्ट या सर्वांचा समागमही क्षणिकच असतो. दोहींकडून दोन नद्यांचे प्रवाह आले म्हणजे त्यातून वहात आलेली लाकडे त्यांच्या संगमावर एकत्र होतात, त्याप्रमाणेच सारी सोयरीधायरीही एके ठिकाणी जमतात व एक लोंढा आला म्हणजे ती लाकडे जशी दाहीदिशाला फाकतात, त्याप्रमाणेच सोयऱयाधायऱयांचीही दशा होते. असे संसारामध्ये अनंत जन्म झालेले असतात, तेव्हा त्या साऱया जन्मातील जीवाची सोयरी असंख्य आहेत. परंतु ज्याप्रमाणे या स्वप्नातील पदार्थ काही दुसऱया स्वप्नात येत नाहीत, त्याचप्रमाणे या जन्मातील सोयरी दुसऱया जन्मात एकमेकाला ओळखत नाहीत. याप्रकारे बायका, मुले, भाऊबंद व सोयरीधायरी ही सारी मायामय असून केवळ काल्पनिक आहेत असे जो निश्चयकरून जाणतो, तोच खरोखर धन्य होय. हे लक्षात घेऊन गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये. एखादा पाहुणा तात्पुरता राहतो, त्याप्रमाणे राहावे. जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादीमध्ये ममता ठेवीत नाही, त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. वरीलप्रमाणे विवेक जो मनात आणतो, त्याला मोह आणि ममता कधीच बाधत नाहीत, अतिथीप्रमाणे तो घरात राहूनही अलिप्त असतो. अशा प्रकारे मान, मोह व ममता ज्याने सोडून दिली, जो घरादारात राहूनही उदासीन, निःस्पृह व निर्लोभ असतो, त्याला संसार बाधत नाही. निर्मोह आणि निरभिमान होण्यासाठी आवश्यक ते वैराग्य विवेक-ज्ञान गुरुभक्तीतून प्राप्त होते. त्यामुळे गृहस्थाला घरात राहूनच निजमुक्ति प्राप्त होते. भक्ताने गृहस्थोचित शास्त्राsक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात किंवा संन्यास स्वीकारावा. जो गृहस्थ घरात राहून आश्रमधर्म पाळत माझी भक्ती करितो, तो मुक्त होतो. याकरिता मनुष्यदेहाला आले असता भगवद्भजन करून जन्ममरण चुकवावे आणि आपला आपणच उद्धार करावा. जीवाला ज्या ज्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात, त्या त्या योनीमध्ये विषयाची आसक्ती ही आहेच. तीच विषयासक्ती जर मनुष्यदेहामध्येही ठेवली, तर मग परमार्थप्राप्ती कोणत्या देहांत करून घ्यावयाची ? परमार्थ साधण्यासाठी मनुष्यदेह हे फार मोठे साधन आहे कारण केवळ मनुष्ययोनीतच ईश्वरप्राप्ती करून घेणं शक्मय आहे पण ही बाब लक्षात न घेता मनुष्य भोगविलासात गुरफटून जातो. पत्नी, कन्यापुत्रांच्या, आप्तांच्या मोहात आंधळा होतो. म्हणून भगवंत माणसाला वेळीच सावध होऊन गुरुभक्ती करायला सांगत आहेत कारण स्वबळावर या मोह ममतेतून बाहेर पडू म्हटलं तर ते शक्मय होत नाही. माणसाची देहबुद्धी त्याला तसे करू देत नाही. देहबुद्धी म्हणजे मी कर्ता आहे ही अहंकाराची भावना होय. माणसाला आपल्या कर्तृत्वामुळे सर्व यश मिळत आहे असे वाटत असते आणि त्या कैफात तो वावरत असतो पण परिस्थितीचे दणके बसले, आप्तेष्टांकडून अव्हेरला गेला की, तो जागा होतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपण योग्यवेळी संसाराच्या असक्तीतून मुक्त झालो असतो तर आज ही वेळ आली नसती असा विचार त्याच्या मनात येतो. असा पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणून भगवंत सांगतात की, सद्गुरूंना वेळीच शरण जावं आणि त्यांचा उपदेश घ्यावा. जो सद्गुरूंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतो त्याला सद्गुरु वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करत असतात. शिष्याकडून भगवत्भक्ती करून घेऊन निजात्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात.
अध्याय सतरावा समाप्त