पाणी न दिल्याने महाराष्ट्र सरकारवर मोठा रोष
जत/प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार सतत अन्याय करत असल्याने जत तालुक्यातील तिकोंडी येथे काहीं ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंचा फलक लावत, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे या भागातील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी गावकऱ्यांनी आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत असेही सांगितले आहे.
दरम्यान, गावातील कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा फोटो असलेला फलक लावण्यात आला होता. काही काळानंतर हा फलक काढून टाकण्यात आला. कर्नाटक आम्हाला गेली चार वर्ष पाणी देत आहे, पण आमचे सरकार अन्याय करत आहे, त्यामुळेच अशी भूमिका घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
तिकोंडीपासून तीन किलोमीटरवर अंतरावर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे. ग्रामस्थांनी शनिवारी कर्नाटकचा फलक, ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोरून बसस्थानकापर्यंत फेरी काढली. महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सोई-सुविधा व अनुदान देत आहे, तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ४ दशकापासून वारंवार आश्वासन देत आहेत. याच मुद्द्यावर निवडणूक लढवल्या आहेत.तसेच पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गावातील कमानीवर बोम्माईंचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला. त्यावर त्यांचे आभार मानण्यात आले होते. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक काढला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊ, असा इशारा दिला.
यावेळी महांतेश अमृत्तट्टी, वसीम मुजावर, महांतेश राचगोंड, सोमनिंग चौधरी, रामू नुली, महादेव कोहळ्ळी, मल्लाप्पा गोब्बी, अनिल हट्टी, तम्माराया अमृत्तटी, इरान्ना राचगोंड, गौडाप्पा माडोळी, अंबाण्णा कोळी आदी उपस्थित होते.