ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Nashik bus accident नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला अन् क्षणार्धात आगीने बसला कवेत घेतले. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे त्यांना तत्काळ बाहेर पडता आले नाही. यात बसमधील 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 38 जण जखमी झाले. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद रोडवरील कैलासनगर भागात पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतला. क्षणार्धात आगीने उग्र रूप धारण केले अन् संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली. बसला आग लागल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. बसमधील 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 38 जण जखमी झाले. घटनेनंतर पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींंना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक वाचा : मान्सूनचा महाराष्ट्राला लवकरच अखेरचा सलाम
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.