प्रवाशांची गैरसोय : त्वरित समस्या निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी झालेल्या किरकोळ पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. एकीकडे स्मार्ट बसस्थानक उभारले जात आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.
बसस्थानक आवारात रस्त्यांची दुर्दशा होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्डय़ातून गढूळ पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे अडचणीचे बनले आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या वाढत असली तरी प्रवाशांना बसस्थानकात सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय काही ठिकाणी बसस्थानकाच्या शेडला गळती लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडाखाली व इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे. आवारात गढूळ पाणी साचून राहिल्याने जवळून बस गेल्यास पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. बसस्थानकात शौचालयाअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानक आवारात शौचालयाची व्यवस्था कधी करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.