उत्तर प्रदेशातील दुद्धी मतदारसंघातल खजुरी या गावातील नाजरानी या महिलेने सौरदिवे वितरणाचा विक्रम केला असून त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेले आहे. अत्यंत गरिबीत बालपण घालविलेले असूनही आणि फारसे शिक्षण नसताना त्यांनी हे दिवे तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. मुलीच्या जातीला काय करायचे आहे शिक्षण? अशी मनोवृत्ती असणाऱया कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. मात्र, त्यांनी स्वबळावर पुढाकार घेऊन रोजगाराचा एक नवा पायंडा पाडून दिला आहे. सौरदिवे निर्मिती करून त्या आज प्रतिदिन एक हजाराहून अधिक रुपयांची कमाई करीत आहेत.
बालपणी त्यांच्या कुटुंबाला गावातील एका शिक्षकाने मोठे साहाय्य केलेले होते. त्यांच्या या साहाय्यामुळेच आज आपण ऊर्जितावस्थेत आहोत, असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या बालपणी रोजची भाकरी मिळविणे या पलीकडे त्यांना काहीही करता येत नव्हते. तथापि, नंतरच्या काळात त्यांनी कष्टाने पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या सौरदिव्यांच्या विक्रीतून फारसा लाभ मिळेल, असे त्या वेळेला कोणालाही वाटलेले नव्हते. मात्र, त्यांनी हाच व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. सौरदिवे बनविण्याचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना मुंबई आयआयटीमध्ये काम करणाऱया प्रशिक्षकाकडून मिळाले. हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना आपले घर सोडून दूरवर रहावे लागले. त्यासाठी आईवडिलांची तयारी नव्हती. तरीही त्यांनी हे आव्हान स्वीकारून आधुनिक प्रशिक्षण घेतले आणि व्यवसायाला नवी झळाळी मिळवून दिली. गेल्या तीन वर्षात त्यांचे उत्पन्न तिप्पट वाढले असून आपल्या आईच्या उपचारांसाठी काढलेले कर्ज त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून फेडले आहे. प्रतिदिन त्या 40 ते 45 दिवे तयार करतात. या दिव्यांची विक्री प्रामुख्याने शाळा आणि रुग्णालयांमध्ये करतात. प्रत्येक दिव्यामागे त्यांना 25 ते 30 रुपयांचा लाभ होतो, असे त्या सांगतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आता आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आलेले असून हाच व्यवसाय आणखी वाढविण्याचा त्यांचा मानस आहे.