केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : गोवा हिंदी अकादमीचा वर्धापनदिन उत्साहात
प्रतिनिधी /पणजी
हिंदी ही आमच्या देशाची संस्कृती आणि संस्कारांचे प्रतिबिंब आहे. तिला वैश्विक स्तरावर नेण्याचे सरकारचे ध्येय असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हिंदीच्या सरलतेमुळे आमचे ज्ञान व संस्कृती प्रसारात मोठे योगदान ठरत आहे. सूचना व तांत्रिक क्षेत्रात हिंदीचा जास्तीत जास्त वापर आणि युवावर्गात तिच्या लोकप्रियतेमुळे भविष्यात या भाषेचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
गोवा हिंदी अकादमीतर्फे संस्थेच्या दुसऱया वर्धापनदिनानिमित्त पणजीत मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर त्यावेळी माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत चोडणकर, समाजसेवक चंद्रकांत गवस, महाराष्ट्रातील शिवछत्रपती विद्यालयाचे प्रमुख कैलास जाधव, गोवा विद्यापीठ हिंदी विभागाच्या प्रमुख प्रो. वृषाली मांद्रेकर, आदींची उपस्थिती होती. त्याशिवाय श्रीकांत पालसरकर, लक्ष्मीकांत परब, उदय नाईक, हेमंती परब, कांचन बोरकर, सुनयना शेट, यांच्यासह अकादमीचे अन्य सदस्यही उपस्थित होते.
हिंदी ही देशाची ओळख-स्वाभिमान
पुढे बोलताना श्री. नाईक यांनी हिंदीच्या प्रसार आणि विकासासाठी प्रयत्नरत असलेल्या अकादमीच्या कार्याची प्रशंसा केली. हिंदी ही देशाची ओळख आणि स्वाभिमान आहे. राष्ट्रभाषेमुळे लोक एकसुत्राने बांधले जातात. त्यामुळे या भाषेबद्दल प्रेम आणि आदर ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
हिंदीची सेवा म्हणजेच राष्ट्राची सेवा
हिंदीची सेवा म्हणजेच राष्ट्राची सेवा. या सेवेत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. हिंदीला हा दर्जा सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी राजेंद्र सिन्हा, मैथिली शरण गुप्ता, हजारीप्रसाद, गोविंददास, यासारख्या अनेक निष्ठावान हिंदी समर्थकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मोठे योगदान दिलेले आहे. त्यानंतर संसदेतही या विषयावर गहन चर्चा झाली व अखेरीस 14 सप्टेंबर 1949 रोजी तिला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला, अशी माहितीही नाईक यांनी दिली.
वाजपेयीनी हिंदीला युनोत पोहोचविले
हिंदीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड लोकप्रियता, मानसन्मान मिळत आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वप्रथम युनोच्या सभेत हिंदीतून भाषण केले होते. आज जगभरात भारतीय लोक विविध स्तरांवर हिंदीतून व्यवहार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हिंदी जगभरात लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
हिंदीमुळे मातृभाषा धोक्यात येणार नाही
दुर्दैवाने आजही काही निर्बुद्ध लोक या भाषेस विरोध करत आहेत. हिंदीला प्रोत्साहन दिल्यास आपली मातृभाषा धोक्यात येईल अशी भीती त्यांना सतावते. मात्र त्यांची ती भीती पूर्णतः व्यर्थ आहे. ती भीती त्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. त्यासाठी हिंदीप्रेमी सर्व नागरिकांनी हिंदीचा मोठय़ा प्रमाणात वापर करून तिची शक्ती वाढविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त लोक हिंदी समजू लागतील, बोलू लागतील, तिचा प्रचार-प्रसार वाढेल तेव्हा अशा विरोधकांची तोंडे आपोआप बंद होतील, असेही श्री. नाईक यांनी पुढे सांगितले.
अकादमीचे अध्यक्ष सुनील शेट यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अकादमीच्या ’कुमूदी’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. अन्य मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.