भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे सूतोवाच
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ’त्या’ आठ आमदारांना आम्ही नाखूश करणार नाही. योग्यतेनुसार आणि योग्यवेळी त्यांना मंत्रीपद किंवा महामंडळ देण्यात येईल हे स्पष्ट आहे. मात्र त्यासंबंधी पूर्ण निर्णय केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी केल्यानंतर मुख्यमंत्री घेतील, असे स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी काल मंगळवारी पणजी भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय पक्ष घेऊ शकत नाही. तो सरकारचा अधिकार. मी भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कोणाला मंत्रिमंडळ किंवा महामंडळ दिले जाईल हे सांगू शकत नाही. भाजपा केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी केल्यानंतरच मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यासंबंधी निर्णय घेतील, असे तानावडे म्हणाले.
असे असले तरी आतापर्यंत मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. 14 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला आता सुमारे चार महिने होत आले असले तरी भाजपने त्यांना प्रतीक्षेत ठेवले आहेत. मध्यंतरी दोन-तीन वेळा या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु नंतर त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या विधानसभेच्या एकुण संख्याबळातील 33 आमदार भाजपचे आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
नाव देण्यामागील भावना महत्वाची : तानावडे
मोप विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले असले तरी ते अपूर्ण वाटत असल्यावरून सध्या लोक टीका, टिप्पणी, नाराजी व्यक्त करत आहेत. सध्या हा मुद्दा बराच गाजत आहे. त्याबद्दल तानावडे यांना विचारले असता, एखाद्या प्रकल्पाला नाव देणे हे जेवढे महत्वाचे असते त्यापेक्षा त्यामागील भावना जास्त महत्वाची असते. त्यामुळे दिलेले नाव मोठे आहे की लहान हा मुद्दा गौण ठरतो, असे ते म्हणाले.
तसे पाहता एकेरी किंवा लहान नाव दिलेला मोप हा राज्यातील एकमेव प्रकल्प नाही. यापूर्वीही अनेक प्रकल्प वा योजनांना अशी नावे दिलेली आहेत. मांडवीवरील नवीन पुलाला दिलेले ’अटल सेतू’ नाव हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृत्यर्थ देण्यात आले आहे. त्याशिवाय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावावरून चालू करण्यात आलेली दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना, राजीव कला मंदीर, नेहरू युवा केंद्र, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे तानावडे म्हणाले.
’मनोहर’ या नावाचा संबंध माजी मंत्री मनोहर आजगावकर यांच्याशी जोडण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावरून सरकारवर मोठी टीकाही झाली होती. मात्र नंतर स्वत: आजगावकर यांनीच त्यासंबंधी स्पष्ट मत मांडताना, मोपसाठी आपलेही योगदान आहे हे खरे असले तरी मोपचे खरे शिल्पकार मनोहर पर्रीकर हेच असल्याचे सांगितले होते, याचे स्मरण तानावडे यांनी यावेळी करून दिले.