ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्याला मंजुरी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी याविषयी माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे.
बच्चू कडू अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं म्हणून संघर्ष करत आहेत. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाला मान्यता दिली आहे. बच्चू कडूंनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयांनंतर आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचं स्वागत केलं.
हे ही वाचा : मांडवली करायची असती तर १०० दिवस तुरुंगात राहिला नसता – उद्धव ठाकरे
राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, “दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे यासाठी बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी आम्ही गेली २५ ते २६ वर्षे लढा देत आलोय. त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठी स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावं यासाठी प्रयत्न केलेल जाणार आहेत. येत्या १५ दिवसांत हे शासन मंत्रालय स्थापन करणार असून दिव्यांग मंत्रालय हा देशपातळीवरील मोठा निर्णय आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आभार मानतो.”