कर्नाटकात सध्याला मतदारांची माहिती चोरी प्रकरण गाजते आहे. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया काँग्रेसमध्ये याच मुद्दय़ावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. वरकरणी वाटते तसे हे प्रकरण सोपे नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून याच प्रकरणाभोवती राजकारण रंगताना दिसून येत आहे. काँग्रेसने थेट मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना या प्रकरणासाठी जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्र्यांवर एफआयआर दाखल करावे, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयात जाण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. भाजपनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाची सुरुवातच काँग्रेसच्या काळात झाली आहे, असा पलटवार करीत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने मतदार माहिती चोरी प्रकरणी सरकारवर गंभीर आरोप केला. बेंगळूर येथील चिलुमे एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, चिलुमे एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, डीएपी होंबाळे प्रा. लिमिटेड या संस्था ठळक चर्चेत आल्या आहेत. 22 डिसेंबर 2018 रोजी चिलुमे या खासगी संस्थेला मतदार याद्यांची दुरुस्ती यासंबंधीची जागृती करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. खरेतर या संस्थेने विनामूल्य सेवा देण्याचा अर्ज बेंगळूर महानगरपालिकेकडे केला होता. या अर्जाचा स्वीकार करून केवळ एकाच दिवसात या खासगी संस्थेकडे सरकारी जबाबदारी सोपविण्यात आली. या संस्थेने परवानगी देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत 2 नोव्हेंबर 2022 रोजी सरकारने चिलुमे संस्थेला दिलेली परवानगी रद्द केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक माहिती उजेडात आली.
मतदारयाद्यांची दुरुस्ती केल्यानंतर यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाच्या गरुडा ऍपमध्ये दाखल करायला हवी होती. मात्र, चिलुमे या संस्थेने खासगी डिजिटल समीक्षा या ऍपमध्ये माहिती संकलित केली. सरकारी माहिती खासगी ऍपमध्ये संकलित करण्याचे प्रयोजनच काय आहे? असा सवाल उपस्थित करून मतदारांची माहिती चोरण्यात आली आहे. बेंगळूर येथील 28 विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात मतदारांची खासगी माहिती चोरण्यात आली आहे, ऑपरेशन कमळ नंतर भाजपने निवडणुकीसाठी राबविलेले हे मोठे ऑपरेशन आहे. अमेरिकेतील वॉटरगेट घोटाळय़ाप्रमाणेच कर्नाटकात व्होटरगेट घोटाळा झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर भाजपनेही काँग्रेस विरुद्ध तक्रार केली आहे.
काँग्रेस नेत्यांनी केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. मतदारयाद्यांच्या दुरुस्तीची कामे मोफत करण्याची हमी देणाऱया चिलुमे या संस्थेने सुमारे 17 हजार जणांची याकामी नियुक्ती केली. त्यांना रोज 1500 रुपये मानधन देण्यात आले. मानधनाची ही रक्कम कोणी दिली? एका बेंगळूर शहरातील 6 लाख 69 हजार 652 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. 3 लाख 7 हजार 535 नवमतदारांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. सध्या हयात असणाऱया मतदारांची नावे का वगळण्यात आली? घरोघरी फिरून मतदारांची वैयक्तिक माहिती जमविणाऱया खासगी संस्थेच्या कार्यकर्त्यांना बुथनिहाय अधिकारी म्हणून ओळखपत्रे देण्यात आली. अधिकारी म्हणूनच या तरुणांनी काम केले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या पोलिसात एफआयआर दाखल झाला आहे. चिलुमे संस्थेचा प्रमुख रविकुमार यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे. बेंगळूर महानगरपालिकेच्या काही अधिकाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. मतदारयादी दुरुस्तीची कामे काँग्रेसच्या राजवटीतच चिलुमे संस्थेला देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या घोटाळय़ांचीही चौकशी करा, अशी मागणी करीत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर हल्ले चढविले आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर अनेकवेळा राजकीय नेत्यांनी संशय घेतला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर तर पराभूत उमेदवार ‘ही मतदान यंत्राची कमाल आहे’ असे आरोप करीत संशय व्यक्त करतात. हा संशय दूर झाला नाही तोच आता मतदारांची माहिती चोरल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात सापडले आहेत. कारण दोन्ही पक्ष आपल्यापरीने खरे आहेत तर नेमकी चूक कोणाची? याचा तपास अजून क्हायचा आहे.
कर्नाटकातील कोकण किनारपट्टीवरील कुकर बॉम्बस्फोटाने केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. अलीकडेच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र पीएफआयच्या नेते-कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. या कारवाईचा बदला म्हणून मंगळूर येथील नागोरी येथे स्फोट घडविण्यात आला आहे. गेल्या शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका ऑटोरिक्षात कुकर बॉम्बस्फोट झाला. शिमोगा जिल्हय़ातील तीर्थहळळीचा मोहम्मद शारीक (वय 25) या तरुणाला सध्या अटक झाली आहे. स्फोटात शारीक जखमी झाला आहे. आयएसआयएसच्या प्रभावामुळे कुकर बॉम्ब तयार करून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच ऑटोरिक्षातून प्रवास करताना कुकर बॉम्बचा स्फोट झाला. शिमोगा, मंगळूर जिल्हय़ात गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले हिंदू कार्यकर्त्यांचे खून, त्यानंतरच्या जातीय दंगली यावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले असते तर हा स्फोट घडला नसता. गुप्तहेर यंत्रणा व पोलिसांच्या अपयशामुळेच ही घटना घडल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत. मंगळूर स्फोटाने कर्नाटक पुन्हा दहशतवाद्यांचे स्लीपर सेल बनत आहे, हे सामोरे आले आहे.