अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले मी त्रिगुणांच्या पलीकडे असतो म्हणून जो भक्त त्रिगुणांच्या कचाटय़ातून सुटून माझ्याकडे येतो त्याचा मी उद्धार करतो. त्यासाठी जीवावर असलेला रज, तम गुणांचा प्रभाव कमी व्हावा लागतो. तो कमी होण्यासाठी सत्वगुणाची वाढ करण्याचा प्रयत्न भक्ताने करावा. त्यासाठी संत साहित्याचं वाचन, सत्संगती, नामस्मरण याची कास धरावी. सद्गुरूंची शिकवण पूर्णपणे अमलात आणावी. त्यापासून रेशभरही इकडेतिकडे सरकू नये. असे करत गेल्यास सत्वगुणाची वाढ होत राहते आणि रज आणि तम गुण हळूहळू क्षीण होत जातात. मग सत्वगुण प्रभावी होतो परंतु त्याने आपला कब्जा घेऊ नये म्हणून सत्वगुणावरही विजय मिळवावा. कारण केवळ शुद्ध सत्वगुण शिल्लक राहिला म्हणजे साधकाला असे स्फुरण होऊ लागते की, जगामध्ये मीच काय तो पावन व अत्यंत धन्य आहे. मला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, माझ्यामध्ये परमानंद प्रकट झाला आहे, असा जो काय सुखाचा अनुभव तोच सत्वाचा बोध झालेल्या सात्त्विकांना असतो. तसं बघायला गेलं तर सत्वगुण हा मायेपासूनच तयार झालेला असल्याने मला ज्ञान प्राप्त झाले, माझ्यामध्ये परमानंद प्रकट झाला अशी भावना शुद्ध सत्वगुणी माणसाच्या मनात सतत होत असते. प्रत्यक्षात आत्मा स्वतः सुखस्वरूपच आहे, मग मला सुखाचा अनुभव होणे हाच मायेचा प्रभाव आहे. मी सुखी व ज्ञानी आहे असे वाटणे म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विसर पडल्यासारखे आहे. म्हणून जेव्हा जेव्हा सत्वगुणी माणसाला आपण फार श्रे÷ आहोत असे वाटू लागेल तेव्हा त्याने आध्यात्मिक साधनेतून मिळणारे सुख आणि ज्ञान मीच त्याला मिळवून दिले आहे हे सदैव ध्यानात ठेवावे. म्हणजे हे सर्व मी मिळवले आहे, मी कर्ता आहे ही भावना लुप्त होईल आणि निखळ गुणविरहीत अवस्था अनुभवता येऊन आत्मानंदाचा आस्वाद कायमचा मिळत राहील. जीवाने जीवभाव विसरण्यासाठी विषयांची विरक्ती धरावी आणि अंतःकरणात कोणत्याही इच्छेला, अगदी मुक्तीच्या इच्छेलाही स्थान देऊ नये. संपूर्ण निरिच्छ होणे हे गुणविरहीत होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीने माझी निरपेक्ष भक्ती अधिकाधिक प्रेमाने करावी. त्यामुळे अपरंपार सत्वशुद्धी होते आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझी उपस्थिती जाणवते. अशी साधकामध्ये स्फूर्ती स्फुरत असते तोच सत्वगुण आत्मरूपामध्ये लयास जातो. तेव्हा सुखाचाही अनुभव संपतो आणि आत्मसुख व आत्मशांतीच काय ती बाकी राहते. अशा प्रकारे तीन गुण नाहीसे झाले म्हणजे केवळ निर्गुणच बाकी राहते. जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणाऱया विकारांपासूनही मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो मग त्याचे कोठेही येणेजाणे होत नाही. मनुष्य जे कर्म करत असतो ते त्रिगुणांच्यामुळे घडते परंतु सत्वगुणात वाढ झाली की रज, तम गुण निष्प्रभ होतात. तसेच सत्वगुण वाढल्यामुळे माणसाला माझ्यासारखा मीच सुखी आणि ज्ञानी असे वाटून अहंकार होण्याची शक्मयता असते परंतु हे सर्व माझी कृपा म्हणून घडून आली आहे हे लक्षात आले की, सत्वगुणाचा प्रभावही कमी होतो. परिणामी भक्त त्रिगुणांच्या कचाटय़ातून मुक्त होतो. अशा प्रकारे तीन गुणांचा नाश झाला असता माणसाला स्वतःचे असे कोणतेही कार्य उरत नाही. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने कार्य, कर्म आणि कारण ही त्रिपुटी नाहीशी होते. सर्व लिंगदेहच नाश पावतो आणि जीवाचे जीवपणच मिथ्या होते. तेव्हा कार्य, कर्म, कर्ता किंवा भोग्य, भोग आणि भोक्ता, ज्ञान, ज्ञेय किंवा मीच काय तो एक ज्ञाता ह्या त्रिपुटींची गोष्टच रहात नाही. ब्रह्म हे अंतर्बाह्य दोषरहित आणि निजानंदाने परिपूर्ण असते. त्याप्रमाणे जीवपण लयास गेले असता तो स्वतः सहज निर्गुण होऊन व अहंसोहंपणा सोडून परिपूर्ण ब्रह्मच होऊन राहतो. असे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले असता साधकाला मरण येतच नाही. ज्याप्रमाणे घडा घडवून झाल्यावरही प्राप्त गतीनुसार कुंभाराचे चाक फिरत असते मग हळूहळू त्यांची गती कमी होत होत ते थांबते. त्यानुसार जर प्रारब्धाने आयुष्य शिल्लक असले, तर ते तो लोककल्याणासाठी व्यतीत करत असल्याने त्याला देहाभिमानाची बाधा नसते.
क्रमशः