प्रतिनिधी/ पणजी
बेकायदा वाळू उत्खनन करणाऱयावर अज्ञात हल्लेखोराने गोळय़ा झाडल्या त्यातून एका मजुराचा नाहक बळी गेला. या धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ माजली. अशावेळी या वाढत्या बेकायदेशीरपणावर योग्य तोडगा काढणे खूप महत्त्वाचे ठरले असून लोक तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली आहे.
त्यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले असून हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी केली आहे. पोलीस तपास करतील आणि दोषींना पकडतील असा विश्वास आहेच, परंतु योग्य धोरण तयार करण्यात सरकारला स्वारस्य नसल्यामुळे गोव्यातील गौण खनिज व्यापाराचा प्रश्न भयंकर गोंधळात सापडला आहे हे पाहून अत्यंत वेदना होत आहेत, असे मत लोबो यांनी व्यक्त केले आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या दबावापुढे स्थानिक प्रशासकीय पातळीवरील अधिकारी झुकत असल्याने लोक बेकायदेशीर खाण व्यवसायामध्ये गुंतलेले आढळतात. त्यातून अनियंत्रित, बेकायदेशीर बाजारातील किंमती अमर्याद वाढल्या आहेत. परिणामी राज्यातील गरीब घटक जो स्वतःचे छोटेसे घर बांधण्याचा वा खरेदी करण्याचा प्रयत्न करतो तो अंतिमतः बळी ठरतो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.