कित्तूर तालुक्यात निच्चणकीजवळ अपघात : दोघी मैत्रिणीही जखमी
प्रतिनिधी /बेळगाव
भरधाव कारने ठोकरल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघी जखमी झाल्या आहेत. कित्तूर तालुक्यातील निच्चणकीजवळ ही घटना घडली असून नियमित बस सुरू करा, या मागणीसाठी आंदोलन करून घरी परतताना ही घटना घडली आहे.
अक्षता इराप्पा हुलीकट्टी (वय 13) रा. शिवनूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या मैत्रिणी अक्षता बसनगौडा पाटील (वय 13), अक्षता महांतेश बबली (वय 13) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कारचालकाविरुद्ध कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवनूरला नियमित बससेवा द्यावी, यासाठी शनिवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात भाग घेऊन पायी चालत घरी परतताना भरधाव कारने ठोकरल्याने ही घटना घडली आहे.
उत्तरीय तपासणीनंतर विद्यार्थिनीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कित्तूरहून बेळवडीला जाणाऱ्या रोडवर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गावकरी संतप्त झाले आहेत. सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कित्तूरचे आमदार महांतेश दो•गौडर यांनी शाळकरी मुलांसाठी सुरळीत बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
कित्तूरहून अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी धारवाडला जातात. काही वाहने कित्तूरला थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांनाही बससेवा सुरळीतपणे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. तरीही परिवहन मंडळाने बससेवा सुरू केली नव्हती. त्यामुळे आंदोलन करून घरी परतणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला आहे.