ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने महामार्गावरील इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान झाले. या घटनेमुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातात जखमी झालेल्या सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या कंटेनरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. ही वाहने एकमेकांना धडकल्याने ती रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या कारचाही चक्काचूर झाला. या अपघातात 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबविले. वाहनांमध्ये अडकलेल्यांना तत्काळ बाहेर काढून त्यांना तेथे आलेल्या 8 ते 10 रुग्णवाहिकांतून उपचारांसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत होते. अपघातातील जखमींची संख्या जवळपास 35 ते 40 होती. किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भागा अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. नवले पुलापासून पाठीमागे कात्रज नवीन बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.