शिंदे-भाजप सरकारकडून 28 चोरांना क्लिनचीट : किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर खोचक शब्दात टिकास्त्र सोडले. विधिमंडळ (संसदिय) पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, अशा शब्दात शिंदे गटावर निशाणा साधत खासदार राऊत यांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचे चोरमंडळ आहे, अशी घणाघाती टीका केली.
शिवगर्जना मेळाव्यापूर्वी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, धाराशिवमध्ये आमदार बच्चू कडू यांना एका नागरिकाने तुम्ही डाकू, दरोडेखोरांबरोबर गेला, अशा शब्दात सुनावले. तो जाब विचारणे म्हणजेच शिवगर्जना आहे. ती राज्यभर पोहचविण्यासाठी आम्ही शिवगर्जना मेळाव्याच्या रूपाने जागृती, प्रबोधन करत आहोत.
राऊत यांनी शिंदे गटावर टिकेची झोड उठविली. ते म्हणाले, विधिमंडळातील पक्ष म्हणजेच शिवसेना असे काही जण म्हणत असतील ते खोटे आहे. ते तर बनावट शिवसेना आहेत. विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपाने चाळीस चोरांचे मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.
शिंदे-भाजप सरकारकडून 28 चोरांना क्लिनचीट
राज्यात सरकार बदलल्यानंतर शिंदे-भाजप सरकारने किरीट सोमय्या यांच्यासह 28 चोरांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबविला आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. ते म्हणाले, आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी करोडो रुपये गोळा केले, त्यांची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत: विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे?, त्यासाठी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्याआधी विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावे.
2024 ला जनताच हिशोब करेल
राज्यात सध्या चोरांना क्लिनचीट दिली जात आहे. जो जाब विचारतो, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्याला तुरूंगात टाकायो, बदनाम करायचे, असे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत खासदार राऊत यांनी 2024 मध्ये राज्यातील जनताच या सर्व गोष्टींचा हिशोब करेल, असा इशारा दिला.
खासदार राऊत म्हणाले…..
-कोरोनाकाळात ठाकरे सरकारकडून आरोग्यविषयक उत्तम काम.
-कोरोना काळातील कामाचे इक्बाल चहल यांच्याकडून कौतुक
-कोरोनाकाळात उत्तर प्रदेशात मृतदेह नदीतून वाहत जात होते.
-गुजरातमध्ये कोरानाकाळात स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या.
-कोरोनाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर योगी आदित्यनाथांवर करा.
-कसबा पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने शिंदे-फडणवीस यांच्याकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर.
-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत होत आहे.