चार उमेदवार बिनविरोध. सर्वाधिक उमेदवारी अर्ज पाळी कोठंबी पंचायतीत. सर्वात कमी अर्ज अडवलपाल पंचायतीत. आज अर्जांची छाननी.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींसाठी एकूण 488 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर व संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे यांच्याजवळ सादर झालेले आहेत. अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी काल सोम. दि. 25 रोजी एकूण 124 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज पाळी कोठंबी पंचायतीत तर सर्वात कमी अर्ज हे अडवलपाल पंचायतीत सादर करण्यात आले आहेत. आज मंगळ. दि. 26 रोजी सर्व उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून बुध. दि. 27 जुलै रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
हि पंचायत निवडून अत्यंत अटीतटीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. सर्व पंचायतींमध्ये भरण्यात आलेले अर्ज पाहता प्रत्येक पंचायतीत मोठी रंगतदार पहायला मिळणार आहे. त्यामुळे जरी हि निवडणूक राजकीय पक्षपातळीवर होत नसली तरी सर्व राजकीय पक्ष व नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी बरीच लॉबिंग केल्याचे दिसत आहे. विरोधी उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आणि वरि÷ नेत्यांनी कंबर कसली आहे.
साखळी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील पाळी कोठंबी या पंचायतीत सर्वाधिक 51 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर सर्वात कमी म्हणजे 12 अर्ज डिचोली मतदारसंघातील अडवलपाल पंचायतीत उमेदवारांनी भरले आहेत. कारापूर सर्वण पंचायतीत 45 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, मये वायंगिणी पंचायतीत 44 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत. तर कुडणे पंचायतीत 24 अर्ज, नाव्हेली पंचायतीत 36 अर्ज, सुर्ल पंचायतीत 28 अर्ज, वेळगे पंचायतीत 25 अर्ज, मुळगाव पंचायतीत 25 अर्ज, साळ पंचायतीत 25 अर्ज, मेणकुरे धुमासे पंचायतीत 19 अर्ज, लाटंबार्से पंचायतीत 33 अर्ज, वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीत 23 अर्ज, नार्वे पंचायतीत 20 अर्ज, पिळगाव पंचायतीत 22 अर्ज व शिरगाव पंचायतीत 25 अर्ज भरण्यात आलेले आहेत.
आतापर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवड निश्चित ?
या पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मुदतीत चार पंचायतींच्या चार प्रभागांमध्ये केवळ एकच अर्ज आल्याने सदर उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यात जमा आहे. पिळगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मध्ये चेतन विष्णू खोडगिणकर, मये वायंगिणी पंचायतीच्या प्रभाग क्र. 11 मध्ये माजी पंचसदस्या सुवर्णा तुळशीदास चोडणकर, अडवलपाल पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये गितेश पुंडलिक गडेकर व लाटंबार्से पंचायतीच्या प्रभाग क्र. कृष्णा प्रकाश आरोलकर या चार उमेदवारांचे एकच अर्ज संबंधित प्रभागांमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता त्यांचे अर्ज आजच्या छाननीत ग्राह्य होण्याचीच या उमेदवारांना प्रतिक्षा असून नंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे आजच्या अर्ज छाननीनंतर उद्या बुध. दि. 27 रोजी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत दोनच किंवा तीन उमेदवार असलेल्या प्रभागांमधील काही दुबळय़ा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी काही प्रबळ उमेदवार आणि राजकीय नेत्यांकडून दबावतंत्राचा किंवा प्रलोभनांचा वापर केला जाऊ शकतो. सदर दबावाला किंवा प्रलोभनांना भुलून जर एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास दोन उमेदवार असलेल्या प्रभागांमधील उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. त्यादृष्टीने आज मंगळवारी सर्वचजण कंबर कसणार आहे.