केजरीवाल यांनी भाजपवर केली टीका
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आम आदमी पक्षाचे संयोजक अन् दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भावनगर येथील दौऱयादरम्यान बोलताना समान नागरी संहितेवरून भाजपवर टीका केली आहे. भाजपने उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात समान नागरी संहिता का लागू केली नाही असा प्रश्न उपस्थित करत केजरीवालांनी निवडणुकीनंतर गुजरातची समिती गाशा गुंडाळणार असल्याचा दावा केला आहे. घटनेतील तरतुदींनुसार पूर्ण देशात समान नागरी संहिता लागू व्हावी. केंद्र सरकारने समान नागरी संहिता देशभरात लागू करावी, परंतु भाजपची वृत्ती खराब असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपने समिती स्थापन केली होती, परंतु निवडणुकीनंतर या समितीने गाशा गुंडाळला. गुजरातमध्येही निवडणुकीनंतर समिती नाहिशी होणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. गुजरात सरकारने समान नागरी संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.