मोबाईल आणि त्यावर खेळता येणारे व्हिडीओ गेम्स, या आजच्या सर्वात महत्वाच्या समस्या मानल्या जात आहेत. विशेषतः बालवयात या सवयी लागलेल्यांचे भवितव्य अक्षरशः धोक्यात आले आहे. व्हिडीओ गेम्समुळे मुलांना अनेक मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे बालपण तर हरविले आहेच, शिवाय तारुण्यातल्या अनेक समस्यांनाही बालपणीच्या या सवयी घातक ठरत आहेत. एकंदर, मानव प्रजातीच्या भवितव्यालाच यामुळे कीड लागली आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. लहान मुलांना या मोबाईल नामक घातक खेळण्यापासून कसे दूर ठेवायचे ही सध्याच्या काळातील मातापित्यांची सर्वात गंभीर समस्या बनलेली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
जपानमधील एका मुलाला अशीच रात्र रात्र जागून व्हिडीओ गेम्स खेळण्याची सवय जडली होती. त्याच्यावर नियंत्रण ठेवणे त्याच्या आईवडिलांना कठीण जात होते. अखेर वडिलांनी बराच विचार करुन एक उपाय शोधून काढला. तो कितपत यशस्वी होईल याची त्यांना प्रारंभी शाश्वती नव्हती. त्यांनी मुलाच्या नकळता त्याच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. त्यामुळे मुलगा रात्री काय करतो हे त्यांना स्पष्टपणे समजू लागले. मुलागाही वडिलांची माहिती नाकारु शकेना. या उपायाचा योग्य परिणाम झाला. आपल्यावर वडिलांची दृष्टी आहे या धाकाने मुलाची रात्री जागून व्हिडीओ गेम्स पाहण्याची सवय सुटली. त्याची रात्रीची जागरणेही थांबली आणि तो व्यवस्थित झोपू लागला. त्याची शाळेतील आणि इतर कामगिरी सुधारली. हळूहळू त्याला खऱया जगातील आव्हाने स्वीकारायची गोडी लागली. आईवडिलांची एक चिंता दूर झाली. मुलाचे भवितव्य सुधारले.
वडिलांनीं मुलाला कोणतीही शिक्षा न देता, न मारता, न ओरडता त्याची घातक सवय सोडविली. असे उपाय आज प्रभावी ठरत आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीचा प्रत्यय अशा प्रकारे येत आहे. शांत डोक्याने कल्पक उपाय शोधल्यास ते प्रभावी ठरतात, हे अनेकदा अशाप्रकारे अनुभवास आले आहे.