अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, जीवनात काहीतरी मिळवावे असे वाटून त्यासाठी देवाची भक्ती करणे ही झाली सकाम भक्ती. याउलट मला काहीच नको फक्त तू हवास म्हणून देवाची केलेली भक्ती ही निष्काम भक्ती होय. निष्काम भक्तीत देवावर केवळ निरपेक्ष प्रेम करायचे असते. स्वतःला काही हवे म्हणून सकाम भक्ती करावी की देवाला आवडते तशी निष्काम भक्ती करावी या झगडय़ात मनुष्य मोह आणि भ्रमाने गोंधळून जातो. त्याचा परिणाम म्हणून क्षणभर परमार्थात गोडी, क्षणभर द्रव्यलोभात गोडी, क्षणभर अनर्थपात करण्यात गोडी, क्षणात परद्रव्य ह्यातच गोडी असं आपलं त्याचं तळय़ात मळय़ात चाललेलं असतं. कोणत्याही प्रसंगात त्याच्या वागण्याच्या अनेक छटा दिसून येतात परंतु या सगळय़ामुळे परस्परविरोधी वातावरण तयार होते. ह्या सगळय़ा गोंधळात माणसाला हवीहवीशी वाटणारी शांती, त्याला कधीच प्राप्त होत नाही. मनःशांती प्राप्त झाल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती कशी होणार? कारण मन शांत असणं हा तर परमार्थाचा पाया आहे. माणसामधील तमोगुण त्याला अधर्माकडे ओढत असतो, रजोगुण देहकर्माकडे लावतो आणि त्यामुळे सत्त्वगुणाची वाढ होत नाही. ह्या सगळय़ा परिस्थितीत जीवाची मुक्तता व्हावी कशी? कारण तिन्ही गुणांची साम्यावस्था स्थापित केल्याशिवाय त्रिगुणांच्या पलीकडे असलेला, जीवाची मुक्तता करणारा ईश्वर प्राप्त होत नाही परंतु इथे तर रज आणि तम ह्या दोहोंच्या कचाटय़ात सत्त्व अडकलेले असते. त्यामुळे ते वाढूच शकत नाही. सत्व वाढल्याशिवाय रज, तम गुणांचा पराभव होऊ शकत नाही. परमार्थ साधण्यासाठी तो होणे अत्यंत आवश्यक आहे. आशा आणि अपेक्षा या रज, तम गुणांच्या वाढीला खतपाणी घालत असतात. तसे होऊन रज, तम बलवान होऊ नयेत म्हणून सत्त्वगुणाची वाढ होण्यासाठी आशा समूळ खणून टाकावी लागते. जेव्हा गुणांची साम्यावस्था असते तेव्हा ते निपचित पडून असतात पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतशा त्याच्या गरजा वाढू लागतात. त्या पूर्ण करण्यासाठी आशा, अपेक्षा या भगिनींची मदत आणि काम क्रोधादि विकार ही शस्त्रे वापरून तो तीन गुणांची त्रिपुटी अंतःकरणांत कल्पनेने उभी करतो आणि अखेर तीच संसारभयाच्या रूपाने उठून, जीवाच्या मुक्तीत बाधा निर्माण करते. गुणांच्या ज्या तीन अवस्था आहेत त्याही तुला स्पष्टपणाने सांगतो. सत्त्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते, असे समज. सत्त्वगुण अंगात असला म्हणजे जीवाला स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था स्पर्शही करीत नाहीत आणि जीवामध्ये सदोदित जागृती नांदत असल्याने इंद्रियप्रवृत्ती सावध असते. रजोगुणाचे प्राबल्य झाले म्हणजे स्वप्नं चित्तवृत्तीला जिंकते. जागृती आणि सुषुप्ती या लांब जातात आणि तो राजस मनुष्य बसल्या बसल्याच स्वप्न पाहू लागतो. तमोगुण जास्त वाढला म्हणजे तो जागृती आणि स्वप्न ह्या दोहोंनाही दूर घालवितो आणि मग जीवाच्या अंगावर अत्यंत गाढ अशी निद्रा येऊन आदळते. त्याला सभेत नेऊन बसविला असता बोलताबोलताच त्याला डुलकी लागते. जेवताजेवतासुद्धा तो खुशाल कडकडून झोप घेतो. उद्धवा! क्षणामध्ये जागृती, क्षणामध्ये सुषुप्ती म्हणजे निद्रा, क्षणामध्ये स्वप्नाचा अनुभव ही तीन गुणांची खरोखर मिश्रित वृत्ती होय, हे लक्षात ठेव. आता जागृती, स्वप्नं आणि सुषुप्ती, या तिन्ही अवस्थांना प्रकट करणारे जे आत्मतत्त्व, त्या चौथ्या अवस्थेला ज्ञाते लोक तुर्यावस्था असे म्हणतात. या तिन्ही गुणांना ताब्यात ठेऊन मनुष्य जेव्हा गुणांच्या पलीकडे जातो किंवा गुणातीत होतो तेव्हा तो तुरीय अवस्थेत जातो. तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिन्ही गुणांकडे साक्षित्वाने पहात असते. देह हा त्रिगुणांनी युक्त असल्याने तुरीय अवस्थेतील योगी केवळ साक्षीरूपाने त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांना व्यापून टाकतो. उद्धवा! जी जागृतीला जागविते, जी स्वप्नांमध्ये स्वप्नाला नांदवते आणि जी निदेलाही निजविते, त्या अवस्थेला तुरीय अवस्था असे म्हणतात.
क्रमशः