ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे. कारण आदित्य ठाकरेंच्या झेड सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तर हजर होते, मात्र त्यांना गृह विभागाकडून त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे हे सुरक्षारक्षक देखील खासगी वाहनाने घेऊन आदित्य ठाकरेंना सुरक्षा पुरवण्यासाठी दाखल झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही सुरक्षा रक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचे दिसले, ज्यावरून आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड कुणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी माझ्या सुरक्षेसाठी माझे शिवसैनिक पुरेसे असल्याचे म्हटले आहे. मात्र सुरक्षेतील निष्काळजीपणाची आता राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगतेय.
आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यासाठी आज दुपारी १२.४० च्या दरम्यान चार्टर्ड विमानाने दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड सुरक्षा पुरवण्यात येणं अपेक्षित होतं. पण आदित्य ठाकरेंना झेड सुरक्षा देणारे सुरक्षारक्षक खासगी वाहनाने दौऱ्यासाठी आल्याचं दिसून आलं. झेड सुरक्षेसाठी गृह विभागाकडून गाड्या पुरवल्या जातात. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यासाठी मुंबईहून गाड्याच आल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचं दिसून आलं.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे, सुरक्षेपेक्षा फॉक्सॉन प्रकल्प महत्त्वाचा, रिफायनी बाबात दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटलं आहे.