ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात वैमानिकासह 17 जणांचा मृत्यू झाला. तर 123 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोकडे (AAIB) सोपविण्यात आला आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
एअर इंडियाचे AXB-1344 हे विमान 191 प्रवाशांना घेऊन दुबईहून कोझीकोडला येत होते. शुक्रवारी रात्री 7.41 च्या सुमारास कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरले. दरम्यान, हे विमान 35 फूट खड्ड्यात गेले आणि विमानाचे दोन तुकडे झाले. मुंबई, दिल्लीवरून मदतीसाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत.
या विमानात 174 प्रवासी, दहा मुले, दोन वैमानिक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामधील 17 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर 123 जण जखमी झाल्याचे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले.
अपघातात मराठी वैमानिकाचा मृत्यू
अपघातग्रस्त विमानांचे सारथ्य करणारे मुख्य वैमानिक दीपक साठे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. साठे हे हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते एअर इंडियात रुजू झाले होते. एअर इंडियात त्यांनी 15 वर्ष सेवा बजावली.