अरविंद केजरीवालांकडून तुलना ः मोठमोठय़ा राक्षसांचा करतोय वध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. श्रीकृष्णाने बालपणी मोठमोठय़ा राक्षसांचा वध केला होता. आप देखील छोटासा पक्ष असून तो बालगोपाळाप्रमाणे आहे. स्वतःसमोरील मोठमोठय़ा राक्षसांचा वध करत आहे. वधाचा अर्थ हत्या नसून आम्ही भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाईचा वध करत आहोत असे उद्गार केजरीवालांनी आपच्या राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलनात काढले आहेत.
10 वर्षे जुन्या आम आदमी पक्षाचे आता देशातील 20 राज्यांमध्ये 1,446 लोकप्रतिनिधी आहेत. दिल्ली अन् पंजाबमध्ये बीज आता वृक्षात रुपांतरित झाले असून लोकांना सावली अन् फळे देत आहेत. गुजरातमध्ये देखील आमच्या पक्षाचे सरकार येणार असल्याचा दावा केजरीवालांनी यावेळी केला आहे.
भारतीय राज्यघटनेचा अन्य राजकीय पक्ष अन् नेत्यांनी अपमान केला आहे. 26 नोव्हेंबर 2012 रोजी राज्यघटनेला वाचविण्यासाठी आम आदमी पक्षाचा जन्म झाला असल्याची टिप्पणी केजरीवालांनी केली आहे.
सत्येंद्र जैन 3 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मनीष सिसोदियांना तुरुंगात पाठविण्याची तयारी केली जात आहे. मंत्री कैलास गहलोत यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले जातील. आप आमदारांना 3-4 महिन्यांसाठी तुरुंगात जाण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल आणि त्यानंतर ते आमचं काहीच बिघडवू शकत नाही. ऑपरेशन कमळचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यात आमदारांना सीबीआय अन् ईडीची धाड पडेल अशी धमकी देण्यात आली आहे. तरीही ‘आप’चा एकही आमदार फुटला नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपकडून टीकास्त्र
करचोरी करणारे लोक आता स्वतःला ‘माखनचोर’ संबोधित आहेत. कुठल्याही राज्यात निवडणूक येताच केजरीवाल त्या राज्यात जाऊन नाटकं करू लागतात. सरकार आम्हाला घाबरले असल्याचे वारंवार म्हणू लागतात. दोन राज्यांमध्ये निवडणूक जिंकल्यावर केजरीवालांना देवत्व प्राप्त झाल्याचे वाटू लागले आहे. ते आता ‘कान्हा’ झाले असून वध करत आहेत. मद्यावरील कराची चोरी करणारा, अबकारी करात घोटाळा करणारा आता स्वतःची तुलना ‘माखनचोरा’शी करत असल्याची उपरोधिक टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांवर केली आहे.