वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममध्ये पुरामुळे सोमवारी आणखीन 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे पूरबळींचा एकूण आकडा आता 24 वर पोहोचला आहे. नागांवमध्ये 4 तर होजई आणि कछारमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला सोमवारी स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. 24 जणांपैकी 19 जणांचा मृत्यू हा पूरामुळे झाला आहे. तर 5 जण भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. याचदरम्यान राज्यातील 34 पैकी 22 जिल्हय़ांमधील 7.19 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
22 जिल्हय़ांमधील 2,095 गावांना पूराचा फटका बसला आहे. एनडीआरएफ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 26,489 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच प्रभावित क्षेत्रांमध्ये 624 मदतशिबिरे आणि 729 मदतसामग्री वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये 1 लाख 32 हजार 717 लोक राहतात. पूरामुळे 1,30,596 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
सैन्य, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, निमलष्करी दल, वायुदलाकडून बचावकार्यासाठी प्रशासनाला मदत करण्यात येत आहे. दीमा हसाओमध्ये वायुदलाच्या मदतीने 25 मेट्रिक टन आवश्यक सामग्री एअरड्रॉप करण्यात आली आहे. तसेच 20 नौकांसह एनडीआरएफच्या 4 पथकांना कछार, होजई, नागांव आणि दीमा-हासमध्ये तैनात करण्यात आले आहे. इस्रोचे एक पथक ड्रोन आणि उपग्रहीय डाटाचा वापर करून दीमा हसाओमधील नुकसानीचे आकलन करत आहे.
आसाम सरकारने प्रभावित लोकांना दिलासा देण्यासाठी कछार आणि दीमा हसाओ जिल्हय़ांना अतिरिक्त प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. तर होजई जिल्हय़ातील पूरग्रस्त लोकांना मदतसामग्री पुरविण्यासाठी 3 कोटीचा निधी प्रदान करण्यात आला आहे.