शिरोभाग ः
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ही केंद्र सरकार संचालित शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या देशभर शाखा आणि शाळा आहेत. विविध विषयांमध्ये ही संस्था विद्यार्थ्यांना शिक्षण देते, त्यांच्या परीक्षा घेते आणि संबंधित परीक्षांचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र प्रदान करते. या संस्थेचे शिक्षण दर्जेदार मानले जाते आणि त्यामुळे या संस्थेचा अभ्यासक्रम असणाऱया शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. तर अशा या लोकप्रिय संस्थेचा प्रारंभ कोणी आणि कसा केला, या संस्थेचे कार्य कसे चालते, कोणाला प्रवेश दिला जातो, पात्रता अटी कोणत्या असतात, कोणते अभ्यासक्रम शिकविले जातात, परीक्षा कशा घेतल्या जातात, गुण कसे प्रदान केले जातात आणि या संस्थेची ग्रेडिंग पद्धती कशी असते, या संस्थेच्या अभ्यासक्रमात, तसेच गेडिंग पद्धतीत विविध टप्प्यांवर कसे परिवर्तन होत गेले आहे, कोणकोणत्या इतर संस्था या संस्थेशी संलग्न आहेत, राज्यांच्या माध्यमिक शिक्षण मंडळांच्या तुलनेत या संस्थेची कामगिरी आणि दर्जा कसा आहे, राज्यांच्या माध्यमिक शिक्षणाशी या संस्थेच्या शिक्षणक्रमाची तुलना कशी केली जाते, आदी मुद्दय़ांसंबंधी अनेकांना कुतूहल असते. या पार्श्वभूमीवर या संस्थेची माहिती आणि आतापर्यंतचा प्रवास यांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न…
प्रारंभ आणि सुरुवातीचा काळ
@नुकताच सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वी परीक्षांचा निकाल घोषित करण्यात आला आहे. यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सीबीएसई ही संस्थाही त्यानिमित्ताने चर्चेत आहे. तिची जडणघडण आणि भारताच्या शिक्षण क्षेत्रात तिचे योगदान यांची माहिती असणे आवश्यक आहे.
@खरे तर हे या संस्थेचे 101 वे वर्ष आहे. 1921 मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत भारतात प्रथम उत्तर प्रदेश उच्च शालेय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. ती करण्याची विनंती ब्रिटिश सरकारकडे मध्य आणि उत्तर भारतातील काही संस्थानांनी केली होती. त्यानुसार ही संस्था स्थापन झाली.
@प्रारंभी राजपुताना, आताच्या उत्तर प्रदेशसह मध्य भारत आणि ग्वाल्हेर हे शिंदे घराण्याचे संस्थान या संस्थेच्या कार्यकक्षेत होते. त्यांनाच संयुक्त संस्थाने (युनायडेड प्रॉव्हिन्सेस) म्हणून ओळखले जात होते. 1929 मध्ये संयुक्त संस्थानांच्या मागणीवरून या संस्थेची व्याप्ती वाढविण्यात आली होती.
@1929 पासून संस्थेच्या कार्यकक्षेत आजच्या राजस्थानातील अजमेर, मारव<ाड, मध्य भारत आणि आणि ग्वाल्हेर या संस्थानांमध्ये ही शिक्षण संस्था प्रस्थापित झाली होती. त्यानंतरच्या 10 वर्षांमध्ये संस्थेची वाढ वेगाने झाली आणि कार्यकक्षाही रुंदावत गेली. संस्थेला देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण महत्व आले.
@तथापि, नंतरच्या काळात देशात विविध भागांमध्ये राज्य विद्यापीठे आणि राज्यांची माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. परिणामी या संस्थेची वाढ खुंटली. त्यानंतरची काही वर्षे ही संस्था केवळ अजमेर, भोपाळ आणि विंध्य प्रदेशापुरती मर्यादित राहिली. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक परिवर्तने झाली.
स्वातंत्र्यानंतरचा काळ
@1952 मध्ये संस्थेच्या घटनेत व्यापक परिवर्तन करण्यात येऊन तिची कार्यकक्षा त्यावेळच्या भाग-क आणि भाग-ड प्रदेशांपर्यंत वाढविण्यात आली. त्याचवर्षी या संस्थेला तिचे सध्याचे नाव, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा सीबीएसई मिळाले. तेव्हापासून ती याच नावाने ओळखली जात आहे.
@1962 मध्ये संस्थेच्या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. देशात अस्तित्वात असणाऱया शिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारणे, देशाच्या शैक्षणिक आवश्यकतांची पूर्तता, ज्या विद्यार्थ्यांचे पालक केंद्र सरकारच्या सेवेत असल्याने त्यांच्या नेहमी बदल्या होतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही संस्थेची उद्दिष्टय़े झाली.
संस्थेची कार्यकक्षा
@कार्यकक्षेच्या संदर्भात संस्थेची वाढ अतिशय झपाटय़ाने झाली आहे. केवळ देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही आज या संस्थेचा अभ्यासक्रम मानण्यात येतो आणि अनेक देशांमध्ये संस्थेच्या शाखा आणि शाळाही आहेत. देशातही प्रत्येक राज्यात ही संस्था आपले महत्व राखून राहिलेली असल्याचे दिसून येते.
@सत्तरच्या दशकात दिल्ली शिक्षण मंडळाचे विलीनीकरण या संस्थेत करण्यात आले. नंतर चंदिगढ, अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमधील सर्व शाळा या संस्थेच्या कार्यकक्षेत आणण्यात आल्या. संस्थेच्या शाळांची संख्या वाढली.
विकेंद्रीकरणानंतर अधिक विस्तार
@80 च्या दशकात संस्थेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. देशाच्या विविध भागांमध्ये संस्थेच्या शाखा, शाळा आणि कार्यालये स्थापन झाली. प्रयागराज, अजमेर, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, गुवाहाटी, पंचकुला, पाटणा, तिरुवनंतपुरम इत्यादी शहरांमध्ये विभागीय कार्यालये स्थापन झाली आहेत.
@या सर्व कार्यालयांवर आणि शाखांवर दिल्लीतील मुख्यालयातून बारकाईने लक्ष ठेवले जाते. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ नये याची दक्षता घेतली जाते. विभागीय कार्यालयांकडून वेळोवेळी अहवाल मागविले जातात आणि त्यांना मुख्यालयाकडून नेहमी विविध सूचना केल्या जातात.
ही आहेत महत्वाची उद्दिष्टे…
या संस्थेची अनेक उद्दिष्टे आणि ध्येये आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे
1. विद्यार्थ्यांना बालवयापासून गुणवत्ताप्रधान आणि तणावमुक्त शिक्षण देण्यासाठी विविध मार्ग आणि उपाय शोधून काढणे. गुणवत्ताप्रधान शिक्षणसाठी निकष निर्धारित करणे, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन, संलग्न शिक्षणसंस्थावर लक्ष ठेवणे.
2. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद स्थापन करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कागदोपत्री नोंद ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांसाठी क्षमता संवर्धन कार्यक्रम आणि अभ्यासक्रमांची रचना करणे, सर्वंकष प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
3. ज्यांच्या नेहमी बदल्या होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे उत्तरदायित्व. शैक्षणिक प्रगतीसाठी कल्पक मार्ग शोधून काढणे, परीक्षा पद्धती आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन या प्रक्रियांमध्ये उत्क्रांतीच्या माध्यमातून प्रयत्न.
परीक्षा कोणत्या घेतल्या जातात…
@प्रत्येक वर्षी मार्चमध्ये 10 वीची अंतिम परिक्षा आणि मे महिन्यात 12 वीची अंतिम परीक्षा. इंजिनिअरिंगसाठी एआयईईई ची परीक्षा. ही परीक्षा 2013 मध्ये जेईई मेन या परीक्षेमध्ये विलीन करण्यात आली. ही परीक्षा सीबीएसई अंतर्गत स्थापन राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणाद्वारे प्रत्येक वर्षी घेतली जाते.
@ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा, उच्च शिक्षणासाठी साहाय्य प्राध्यापक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, दहावी पर्यायी गुणवत्ता (प्रोफिशियन्सी) परीक्षा, केंद्रीय विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणाऱया प्रवेश परीक्षा आणि तत्सम इतर परीक्षा.
ग्रेडिंग (गुणानुक्रम) पद्धती कशी असते…
@पूर्वीच्या पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांवर गुणानुक्रम ठरत असे. 9 श्रेणींमध्ये हे ग्रेडिंग विभागलेले असे. 90 पेक्षा जास्त गुणांसाठी ए 1, 81 ते 90 टक्यांसाठी ए 2, 71 ते 80 टक्क्यांसाठी बी 1, 61 ते 70 टक्क्यांसाठी बी 2, 51 ते 60 टक्क्यांसाठी सी 1, 41 ते 50 टक्क्यांसाठी सी 2, 33 ते 40 टक्क्यांसाठी डी, 21 ते 32 टक्क्यांसाठी ई 1 आणि 0 ते 20 टक्क्यांसाठी ई 2.
@नंतरच्या पद्धतीत काही परिवर्तन करण्यात आले आहेत. त्यानुसार विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱया उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी एक अष्टमांश (1/8) विद्यार्थ्यांना ए 1, त्यापुढच्या एक अष्टमांश (1/8) विद्यार्थ्यांना ए 2, त्यापुढच्या एक अष्टमांश विद्यार्थ्यांना बी 1, त्यापुढच्या एक अष्टमांश विद्यार्थ्यांना बी 2, त्यापुढील एक अष्टमांश विद्यार्थ्यांना सी 1, त्यापुढील एक अष्टमांश विद्यार्थ्यांना सी 2, त्यापुढील एक अष्टमांश विद्यार्थ्यांना डी 1. त्यापुढील एक अष्टमांश विद्यार्थ्यांना डी 2 आणि अनुत्तीर्णांना ई असे गेडिंग दिले जात आहे. हे सर्व गेडिंग थिअरी आणि ज्या विषयांना प्रॅक्टिकल असेल तर त्याला प्रत्येक विषयाचे स्वतंत्र दिले जाते. त्यातून सर्व विषयांचे एकत्रित गेडिंग ठरविले जाते.
@नव्या पद्धतीनुसार गेडिंग ठरविताना मुख्य (ऍबसोल्युट) आणि पर्सेंटाईल अशी विभागणी करण्याची पद्धत अवलंबिली जाते. पर्सेंटाईल पद्धतीत विषयाच्या काठिण्यपातळीनुसार गेडिंग केले जाते. उदाहरणार्थ गणितात ए गेड मिळाल्यास 9 गुण धरले जातात. मात्र इंग्रजीमध्ये ए गेड मिळाल्यास 7 गुण धरले जातात. ही पर्सेंटाईल पद्धती जटील असून अनेकदा टीकेचा विषयही बनली आहे.
@उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात आणि प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्ररित्या किमान 100 पैकी 33 गुण मिळावे लागतात. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ई पेक्षा वरची श्रेणी त्या विषयात किमान मिळवावीच लागते. समान गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांना समान श्रेणी दिली जावी असा नियम करण्यात आला आहे.
2020 पासूनचे परिवर्तन
@गणित या विषयाच्या 2 परीक्षा घेतल्या जातात. ज्यांचे गणित उत्तम असते त्यांच्यासाठी ‘मॅथॅमॅटिक्स स्टँडर्ड’ आणि ज्यांचे तितकेसे चांगले नसते त्यांच्यासाठी अधिक सोपे ‘मॅथॅमॅटिक्स बेसिक’ अशा दोन परिक्षा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहेत. आपल्याला कोणता पर्याय पाहिजे हे 10 वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रात नमूद करावे लागते. ही सोय केवळ 10 वीच्या परीक्षेसाठी आहे.
@दहावीसाठी 5 मुख्य विषय असून त्यात दोन भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांचा समावेश असतो. तर 2 विषय पर्यायी असतात. त्यात कौशल्य विषय किंवा तिसरी भाषा आणि वरीलपैकी नसलेला एक विषय घेता येऊ शकतो. प्रत्येक विषयाची परीक्षा 100 गुणांची ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक विषयाची अंतर्गत परीक्षा (इंटर्नल ऍसेसमेंट) केली जाते.
सीबीएसई आकडेवारीत…
@कार्यकक्षेत देशातील शाळा 24 हजारांहून अधिक
@कार्यकक्षेतील केंद्रीय विद्यालये ः 1,200 हून अधिक
@26 देशांमध्ये विस्तार ः 240 हून अधिक शाळा
@सर्वाधिक प्रवेश परीक्षा व्यवस्थापनाचा जागतिक विक्रम
संकलन- अजित दात्ये, बेळगाव