जालना, पुणे / प्रतिनिधी :
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे. अन्यथा, ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने पाहावी लागेल, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात दिला.
जालन्यातील हिंदूगर्वगर्जना कार्यक्रमात बोलताना असताना त्यांनी हे धक्कादायक विधान केले. त्यावरून शिवसेनेच्या गोटातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. सत्तार म्हणाले, आमचीच शिवसेना खरी सेना आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. आता त्यांचे नेतृत्व सर्वांनीच मान्य केले असून, उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य करायला हवे. शिंदे यांच्याशी ठाकरे यांनी जुळवून घ्यायला हावे. अन्यथा, त्याचे परिणाम चांगले नसतील. ठाकरे यांना आपली सेना दुर्बिणीने शोधावी लागेल.
अधिक वाचा : राज्याला वादळी पावसाचा इशारा, तीन दिवस पावसाचा अंदाज
एकनाथ शिंदे हे यूपीएच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते., असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला होता. त्यावर सत्तार म्हणाले, मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. अशोक चव्हाणांसोबत सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी आम्हीच एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो होतो. चंद्रकांत खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.