वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील शिक्षण कर्मचारी भरतीतील घोटाळ्यासंदर्भात प्रवर्तन निदेशालयाने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नातेवाईक अभिषेक बॅनर्जी तसेच त्यांची पत्नी रुजिरा यांच्या विरोधात समन्स काढले आहे. ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. ती फेटाळण्यात आली आहे.
न्या. बेला त्रिवेदी आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली होती. सोमवारी खंडपीठाने आपला निर्णय दिला असून पाचिका फेटाळली आहे. ईडी आपल्याला या प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीत बोलावू शकत नाही. तसेच चौकशीसाठी आमच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही, अशीही मांडणी अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या याचिकेत केली होती.