अध्याय एकविसावा
जे निरंतर सर्वत्र समभाव ठेवून एकाग्रमनाने माझ्या भजनात अति तत्पर राहातात, ते प्रकृतीच्या पलीकडे जाऊन माझ्यासारखेच होतात. असे सांगून
भगवंत उद्धवाला पुढे म्हणाले, अधिकारभेदाप्रमाणे तीन प्रकारचे वेदमार्ग हेही माझ्या प्राप्तीची उत्तम साधने आहेत. मी सांगितलेल्या वेदमार्गाचे जो अनु÷ान करेल, त्याला आपल्या आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा पाहिजे त्या स्वरूपाची प्राप्ती होते. मंत्रांच्या योगेकरून आपले आराध्य दैवत प्रसन्न करून घेता येते असे वेदवेत्त्यांचे म्हणणे आहे. सगुणसाक्षात्कारात, वैकुंठालाच मुख्य म्हणतात. सात आवरणांच्या बाहेर आणि मायावरणाच्या आत श्रीहरीने वैकुंठाची रचना केली आहे, असे वेदान्तात म्हटले आहे. भगवंताने आपल्या लीलेने वैकुंठ रचलेले आहे, म्हणून त्याला नाश नाही. जेथे लीलेने इच्छित देह धारण करणारा मेघकांतियुक्त प्रत्यक्ष पुरुषोत्तम राहात असतो, तेथे गुण, काळ, कर्म किंवा माया इत्यादि भ्रम राहात नाहीत. असे जन्म व मरणरहित वैकुंठ हे अक्षयी व नित्यच असते. उद्धवा ! तेथे जे जाऊन पोचतात ते नित्यमुक्त होतात पण वेदान्तशास्त्रज्ञ ह्याविषयी असे म्हणतात की, अत्यंत प्रलयाचा आघात हा वैकुंठकैलासादि सारे लोक अर्थात् जेवढे साकार म्हणून आहेत तेवढे सर्व नाहीसे करून टाकतो. त्या वेळी गुणातीत असते तेवढेच काय ते शिल्लक राहाते.
उद्धवा ! तेच खरोखर सदा सर्वकाल नित्य असणारे पूर्णब्रह्म होय. जेथे काळही नाही आणि कर्मही नाही, जेथे गुणही नाहीत आणि धर्मही नाही, माया ही जेथे नाश पावते तेच परब्रह्म होय. माझे स्थान वैकुंठ हे होय. तेथे ‘सगुण-सायुज्याचा’ लाभ होतो पण निरंतर परिपूर्ण ब्रह्म हीच ‘पूर्ण-सायुज्यता’ होय. असे पूर्ण परब्रह्मस्वरूप होण्याला साधकांना बिनधोक मार्ग कोणता ? तर वेदात सांगितल्याप्रमाणे माझी भक्ति करणे हाच सुगम आणि उत्तमोत्तम मार्ग होय. दुसऱया मार्गाने गेले तर कामलोभादि विघ्न उत्पन्न होतात किंवा ज्ञानाभिमान खड्डयात घालतो व वेदोक्तकर्मत्यागाचा दोष मात्र पदरात पडतो. तसे भक्तिमार्गात नाही. त्यात आपल्याला नवविधाभक्तिरूप नऊजण सोबतीला असतात. मद्भावयुक्त भक्तीच्या युक्तीमुळे प्रत्येक पावलाला अत्यंत विश्रांति मिळते. ह्यातील मुख्य साधन हेच की, जीवप्राण गेला तरी गुणदोष म्हणून कधी पाहावयाचे नाहीत. त्याच वेळेस परिपूर्ण ब्रह्माची प्राप्ती होते.
जेथे भय, भ्रांति, काही नाही, जेथे दिवस आणि रात्र नाही, जेथे जीव अणि शिव हा भेद नाही, त्याच ब्रह्माला माझे भक्त पावतात. जेथे रूप नाही, नाम नाही, काळ नाही, कर्म नाही, जेथे जन्म नाही व मरणही नाही त्या परब्रह्माला ते पोचतात. जेथे ध्येय नाही, ध्यान नाही, जेथे ज्ञेय नाही, ज्ञान नाही, मीपण नाही व तूपण नाही अशा परिपूर्ण ब्रह्माला पोचतात. ज्याला आई नाही आणि बापही नाही, जे देवही नव्हे आणि देवताही नव्हे जे एकही नव्हे आणि अनेकही नव्हे अशा परब्रह्मालाच खरोखर ते पोचतात. ज्यात वर्ण नाही व आश्रमही नाही, ज्यात क्रिया नाही व कर्मही नाही आणि ज्यात मायेचा भ्रमही नाही त्या ब्रह्माला ते पोचतात. जे गुणागुणांच्या पलीकडे असते, जे लक्ष्यलक्षणारहित असते, जे सदोदित स्वानंदाने परिपूर्ण असते, ते ब्रह्म माझ्या भक्तांना प्राप्त होते. उद्धवा ! पूर्ण कृपेचे आलेले भरते मला देवाधिदेवाला आवरेना. तोच हा एकादश स्कंधांतील विसावा मी तुला दिला आहे जेथे देहभानाला ठिकाण नाही, जेथे जीवशिवाचे तादात्म्य घडते,
उद्धवा ! जेथे अहंभावाचा नाश होतो, मायेच्या नावाने शून्य पडते, जेथे देवभक्तांचे एकरूप होते तो हा एकादशस्कंधांतील विसावा मी तुला दिला आहे. स्वानंद मिळवावयाचा तर तो कष्टाने मिळवावा लागतो पण त्या स्वानंदाचा आयता ठेवा मी तुला दिला आहे.
अशा प्रकारे भावार्थाचा भाव काढून, सोलीवातील सोलीव गाभा, गाळीवातील भक्तिभाव गाळून देव उद्धवाला देत आहेत. अशा प्रकारे स्वानंदनिर्भर होऊन श्रीकृष्णांनी विसाव्या अध्यायाची कथा आनंदाने उद्ध्वाला सांगितली.
विसावा अध्याय संपूर्ण झाला