बुद्धिमत्तेबाबत स्त्री-पुरूष असा भेद करणे मूलतः चुकीचे आहे. पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात महिला काम करू शकतात, उलट पुरूषांपेक्षा त्यांची निर्णयक्षमता अचूक असते, असे वेळोवेळी लक्षात आले आहे. निर्णयप्रक्रियेमध्ये महिलांना स्थान देण्याचे काम ब्रिटिशांनी सर्वप्रथम केले. दुसऱया महायुद्धात इंग्लंडमधील तरूण कामी आले. त्याचा फटका त्यांना बसला, तेव्हा त्यांनी महिलांना सगळय़ा क्षेत्रात संधी द्यायला सुरूवात केली. त्यानंतरच्या टप्प्यात जगभरात जिथे जिथे ब्रिटिशांनी आपले हातपाय पसरले होते, तेथील महिलांना संधी मिळायला लागली. आणि एकविसाव्या शतकात जगभरात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने स्त्री-पुरुषांच्या बाबतीत डावे-उजवे करण्याची मानसिकता बदलून टाकली. हा तपशील सांगण्याचे कारण, यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मुलींनी मिळवलेले यश नजरेत भरणारे आहे. या नागरी सेवा परीक्षांमध्ये भारतात मुलीच टॉपर आहेत. श्रुती शर्मा ही उत्तरप्रदेशातील बिजनौरची विद्यार्थिनी पहिली आली. त्यानंतर बिहारची अंकिता अग्रवाल, गामिनी सिंग, ऐश्वर्या वर्मा या मुलींनी आपली मुद्रा उमटवली आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीच्या प्रियंवदा म्हाडदळकरने पहिला क्रमांक पटकावला आहे. ‘परीक्षेत मुलींनी बाजी मारली,’ या विधानात ‘माहिती’ असली तरी मुलींच्या गुणवत्तेला काकणभर कमी समजण्याची सहजवृत्ती दिसून येते. या परीक्षेत महाराष्ट्रात अनय नावंदर हा सोलापूरचा विद्यार्थी दुसरा आला आहे. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील 47 उमेदवार यशस्वी झाले आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, शाहुवाडी, रत्नागिरी, कागल अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील विद्यार्थ्यांचे यश अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ पुण्या-मुंबईचीच मुले-मुली यशस्वी होतात, हा समज त्यांनी गैर ठरवला आहे. अभ्यासाबाबत यूपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मते किंवा प्रतिक्रिया विचारल्या जातात. पण अगदी पहिलीपासून शेवटच्या परीक्षेपर्यंत आणि शिक्षण संपल्यानंतरही आयुष्यभर एकाग्रता ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. तिला परीक्षेशी किंवा अभ्यासाशी जोडणे उचित नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता आवश्यकच आहे. दुर्दैवाने आपल्या पाठ्यक्रमात एकाग्रतेबाबत काहीही शिकवले जात नाही. ‘अभ्यास’ गृहपाठाशी जोडल्याने त्याचे महत्त्व परीक्षेत गुण मिळवण्यापुरते मर्यादित झाले आहे. गृहपाठ किंवा परीक्षेत विचारल्या जाणाऱया उत्तरांची घोकंपट्टी यापेक्षा ‘अभ्यास’ निराळा असतो हे विद्यार्थ्यांना कुणीही सांगितलेले नाही. सोलापूरच्या अनय नावंदरने आपल्याला ध्यानाचाही लाभ झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, अनयने कोठेही खासगी शिकवणी किंवा ‘टय़ुशन’ लावलेली नव्हती. अभ्यास करण्याची स्वतःची पद्धत त्याने विकसित केली होती. ध्यान हा त्यातलाच एक प्रकार. तसे तर एकाग्रता आणि ध्यान या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. या दोन्ही गोष्टी भारतीय योगशास्त्राच्या देणग्या आहेत. त्या आत्मसात करण्याची विशिष्ट पद्धत आणि साधना आहे. मुद्दा आहे तो अभ्यासाचा आणि परीक्षेतील यशाचा. त्यासाठी परीक्षा पद्धतीनुसार नियोजन करावे लागते. थोडक्मयात, तशी ‘स्ट्रटजी’ ठरवावी लागते. वैद्यकीय, अभियांत्रिकी, दहावी, बारावी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची याचा सराव करावा लागतो, तो अभ्यासाचा एक भाग झाला. प्रियंवदा म्हाडदळकरला परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी वृत्तपत्रांतील बातम्यांचा खूप उपयोग झाला. चालू घडामोडीच्या तयारीसाठी बातम्या वाचणे महत्त्वाचे आहे, असे तिचे म्हणणे आहे. आयआयएम, बेंगळुरूमधून एमबीए केल्यानंतर मोठय़ा पदावर पोहचलेल्या प्रियंवदाला प्रशासकीय सेवेत कारकीर्द करण्याची ऊर्मी गप्प बसू देत नव्हती आणि तिने राज्यात प्रथम येऊन आपले हे स्वप्न साकारले. जिद्द अशी शांत बसू देत नाही. सतत कार्यप्रवृत्त करते, त्याचे हे उदाहरण म्हणता येईल. विषय आत्मसात करणे आणि प्रश्नांची उत्तरे देणे हे वेगवेगळे प्रकार आहेत. ‘यूपीएससी’सारखी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱया तरूणांना त्यातील फरक ठाऊक नाही, असे म्हणता येणार नाही. वास्तविक, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच खरी परीक्षा सुरू होते आणि ती नोकरीतून निवृत्त होईपर्यंत दररोज असते. आर्थिक स्थैर्याचे साधन म्हणून ‘आयएएस’ किंवा ‘आयपीएस’ परीक्षेकडे पाहणे चुकीचे आहे. खऱया अर्थाने ‘लोकसेवा’ करायची असेल तर या सेवेत रूजू व्हायला हरकत नाही. जीवनात सर्व प्रकारचे ‘स्थैर्य’ मिळवण्यासाठीच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तरूण जीवाचा आटापिटा करतात, असे लक्षात आले आहे. त्यामुळे ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. यंदाच्या यशस्वितांमध्ये अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवलेले उमेदवारही लोकसेवेसाठी सिद्ध झाले आहेत, हे लक्षणीय आहे. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी देशात सध्या 180 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये अर्थातच खुल्या प्रवर्गाबरोबरच आर्थिक मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अशा राखीव जागा आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार, त्यांना विविध ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली युनिर्व्हसिटीचे अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये प्रतिवषी भारतीय स्तरावर यश मिळवतात, हे उल्लेखनीय आहे. प्रशासकीय सेवेसाठी सिद्ध झालेल्या या तरुणाईला आपले कर्तृत्व दाखवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. नोकरी करण्यापुरती ती सीमित न ठेवता समाज बदलासाठी, विकासासाठी आणि आपला देश जगात अव्वल ठरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. नोकरीवर नियुक्तीपूर्वी या सर्व यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते, त्यात ही नोकरी नसून जनतेच्या सेवेची संधी आहे हे सांगितले जाते. तथापि, तो प्रशिक्षणाचा एक भाग ठरू नये. भावी प्रशासकांचे अभिनंदन करताना त्यांनी जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, इतकीच अपेक्षा.
Previous Articleशिवकुमार यांना दिल्लीतील न्यायालयाकडून समन्स
Next Article अखिलेश अन् राहुल यांच्यात फारसा फरक नाही!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.