ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नामांतरण केलं. शहरांची नावे बदलून काय साध्य होणार? बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल किंवा विकास होत असेल, तर आमचा विरोध नाही. पण तुम्ही मुस्लिमांची नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर भाषणावेळी केली.
अबू आझमी म्हणाले, जुन्या शहरांची नावे बदलून काय करणार, नवीन शहर वसवा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शहर वसवा, टाळय़ा वाजवून स्वागत करू. दरम्यान, बहुमतापेक्षा संविधानावर लक्ष देणं आवश्यक आहे. बहुमातातील सदस्य जर याविरोधात निर्णय घेत असतील तर आम्ही काय करावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोठे पक्ष त्यांची कामे तत्काळ कोणत्याही अडचणीशिवाय करवून घेतात. मात्र, लहान पक्षांना याचा फटका बसतो. एखादी मागणी करण्यासाठी किंवा विषय मांडण्यासाठी दिवसभर बसावे लागते. भाषणाला सुरुवात करताच वेळ संपली असे सांगितले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुस्लिमांची नावं काढली जात आहेत, या अबू आझमी यांच्या वाक्याला विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून त्याचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नसल्याचे जाधव यांनी सांगितले.