प्रभाग पुनर्रचनेस सरकारची मान्यता : प्रभाग राखीवतेच्या कामालाही सुरुवात
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकार तसेच राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकीची तयारी नेटाने चालवली असून मतदान होणार असलेल्य 186 पंचायतींच्या वॉर्ड पुनर्रचनेस सरकारने मान्यता दिली आहे. आयोगातर्फे वॉर्ड पुनर्रचनेचा मसुदा सरकारकडे पाठवण्यात आला होता आणि सरकारने तो स्वीकारल्याची माहिती पंचायत खात्याच्या सुत्रांनी दिली. वॉर्ड पुनर्रचना लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून आता वॉर्डच्या आरक्षणाचे काम आयोगाने हाती घेतल्याची माहिती मिळाली आहे.
येत्या 4 जून रोजी पंचायत निवडणूक घेण्याच्या इराद्याने आयोगाने हालचाली सुरु केल्या असून वॉर्डातील मतदारसंख्या तसेच एससी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारण (जनरल)या तपशीलावर वॉर्डांचे आरक्षण होणार आहे. दरम्यान, वॉर्ड पुनर्रचनेसाठी एकुण 913 सूचना, तक्रारी, सुधारणा याकरीता अर्ज आले होते. त्यांची दखल घेवून ते अर्ज निकालात काढण्यात आले असून वॉर्ड पुनर्रचना निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात 42 निर्वाचन नोंदणी अधिकारी
यापूर्वी झालेल्या पंचायत वॉर्ड आरक्षणासाठी जो निकष लावण्यात आला होता त्याच निकषावर आरक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पंचायत निवडणुकीसाठी सुमारे 42 जणांना निर्वाचन नोंदणी अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून त्यात मामलेदार संयुक्त मामलेदार, अव्वल कारकुन यांचा समावेश आहे.
दरम्यान, इच्छूक उमेदवारांनी आपपल्या वॉर्डात निवडणूक तयारी सुरु केली असून आता एकंदरीत निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होतो याकडे ते लक्ष ठेवून आहेत. पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर नसल्याने कोणालाही त्यात उतरण्याची संधी प्राप्त झाली आहे.