पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे राजस्थानमध्ये उद्घाटन
जयपूर, दौसा / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी देशातील सर्वात मोठय़ा द्रुतगती एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. दिल्ली ते मुंबई या द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 1,385 किमी आहे. 247 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यात आठ मार्गिका आहेत. हा दुतगती महामार्ग म्हणजे विकसनशील भारताचे भव्य चित्र आहे. अशाप्रकारच्या आधुनिक रस्ते बांधणीतून देशाच्या प्रगतीला गती मिळते, असे दौसा येथील महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान म्हणाले.
देशाची मुख्य राजधानी (नवी दिल्ली) आणि आर्थिक राजधानी (मुंबई) यांना जोडणाऱया दुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधानांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या महामार्गाच्या निर्मितीमुळे दिल्ली-दौसा-जयपूर प्रवासाचा वेळ निम्मा होईल. या प्रकल्पांमुळे राजस्थानसह मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचे चित्र बदलणार आहे. हा द्रुतगती मार्ग अनेक राज्यांशी बंदरे, लॉजिस्टिक पार्क जोडेल. हा देशातील सर्वात आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. केंद्र सरकार गेल्या 9 वर्षांपासून अशा प्रकल्पांवर मोठा खर्च करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले हे बजेट 2014 च्या तुलनेत पाचपट अधिक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पायाभूत सुविधांमुळे सर्वांनाच फायदा
आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणखी एक बाजू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रस्तेउभारणीसारख्या पायाभूत सुविधा निर्मितीमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांना अनेक फायदे होतात. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवलेल्या रकमेचा तेथील सुविधांवर अनेक पटींनी परिणाम होत असतो. सर्वसामान्यांना फायदा होण्याबरोबरच गुंतवणूक अनेक पटीने वाढत असल्याने अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते असे पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या की रोजगार आणि व्यवसायाला मोठी शक्ती मिळते असे सांगताना विकासातूनच देश पुढे जात असल्याचे ते म्हणाले.
सभेला संबोधन
एक्स्प्रेस वेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी भाजपच्या सभेला संबोधित केले. येथे उपस्थित असलेल्या गर्दीबाबत भाष्य करताना ‘हा टेलर आहे, चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे’ असे ते म्हणाले. काही लोकांनी राजस्थानला आजारी राज्य म्हणत छेडले आहे, मात्र भाजप राजस्थानला विकसित भारताचा सर्वात मजबूत आधार बनवत आहे. राजस्थान दिल्ली-मुंबईला जोडत असल्यामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अधिक शक्तिशाली होईल, असेही पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले.
नऊ वर्षात विकासापासून वंचित राहिलेल्या लोकांकडे आम्ही लक्ष दिले आहे. गरीब, मागास, आदिवासी, बंजारा, पथारी विपेत्यांसह प्रत्येक वर्गाची काळजी घेण्यात आली आहे. आमच्या सरकारने पहिल्यांदाच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला आहे. अभियांत्रिकी-वैद्यकीय शिक्षण इंग्रजीतून होत असल्याने गावातील आदिवासी कुटुंबे मागे राहिली, त्यामुळेच स्थानिक भाषेतून हे शिक्षण घेण्यावर आम्ही भर दिला असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.