परराज्यातील वाहनांचा चुकतो अंदाज
प्रतिनिधी /धारबांदोडा
कासावली-मोले येथील उतरणीवर पावसाचे पाणी साचत असल्याने अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. सोमवारी रात्री कोसळणाऱया मुसळधार पावसावेळी या धोकादायक रस्त्याचा अंदाज न आल्याने कर्नाटक राज्यातील एका कारगाडी रस्त्याच्या बाजूला उलटली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर कासावली येथे उतरणीवर हे पावसाचे पाणी साचून राहते. भरधाव वेगात आलेल्या या कारगाडीच्या दर्शनी काचेवर पाण्याचा फवारा उडाल्याने चालकाला समोरील रस्ता दिसला नाही व वाहन थेट बाजूच्या पाण्यात उलटले. दैव बलवत्तर म्हणून आंतमध्ये असलेल्या चार प्रवाशांच्या जिवावरील प्रसंग टळला. कासावली येथील या रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी भरुन राहते. परराज्यातून येणाऱया वाहनांना नेमका त्याचा अंदाज येत नाही व अपघात होत असतात. एखादा मोठा अपघात होऊन कुणाच्या जीवावर बेतण्यापूर्वी संबंधीत खात्याने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कासावली येथील हे वळण अत्यंत धोकादायक होते व यापूर्वी अनेक अपघात होऊन प्रवाशांचे बळीही गेले होते. काही वर्षांपूर्वी हे वळण कापून रस्ता सरळ करण्यात आला. मात्र वळणावरील धोका टळला असला तरी रस्त्यावर साचणाऱया पाण्यामुळे ही जागा आता अपघातप्रवण क्षेत्र बनली आहे.
माले ते पुरणशेत धारबांदोडा पर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक मानला जातो. पुरणशेत येथे असलेले असेच नागमोडी वळण होते. तेथेही वारंवार अपघात व्हायचे. सन 2012 साली आमदार गणेश गावकर यांनी आपल्या मागील कार्यकाळात या धोकादायक अपघात क्षेत्राची दखल घेऊन एकतर्फी बगलरस्ता तयार केला होता. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत येथील अपघातांचे प्रमाण घटले आहे. सुकतळी ते राजलक्ष्मी पेट्रोलपंप दरम्यान रस्ता उंच सकला असल्याने दोन्ही बाजूंनी भरधाव वेगात येणऱया वाहनांना अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. अनेक वाहनचालक व प्रवाशांनी याठिकाणी झालेल्या अपघातात आपले जीव गमावले आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन वाहनांमध्ये अपघात होऊन बिजापूर येथील तरुणाचा मृत्यू होण्याची घटना याच ठिकाणी घडली होती. हा रस्ताही वाहतुकीस सुरक्षीत करण्याची वाढती मागणी आहे.