वाढलेली मालवाहतूक, अरुंद रस्ता, धोकादायक वळणे व कडा कारणीभूत : रूंदीकरण अडल्याने संतप्त प्रतिक्रिया
प्रतिनिधी / काणकोण
अनमोडमार्गे बेळगाव आणि चोर्ला घाटातून मालवाहू वाहनांची वाहतूक बंद झाल्यानंतर अणशी घाट आणि अरवेल घाटमधून कारवारमार्गे गोवा अशी मालवाहू वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. अशा परिस्थितीत करमल घाटातील अरुंद रस्ता, रस्त्याच्या बाजूची धोकादायक परिस्थिती व धोकादायक वळणांमुळे काणकोण ते मडगाव मार्गावरील प्रवास असुरक्षित बनलेला आहे.
दिवसाला एक या प्रमाणात करमल घाटात मालवाहू वाहनांचे अपघात घडायला लागले असून यामुळे इस्पितळांत उपचार घ्यायला जाणारे रुग्ण, सरकारी तसेच निसरकारी व खासगी कार्यालयांत कामाला जाणारे कर्मचारी, विविध महाविद्यालयांत शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, वेर्णा, कुंकळळीसारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये जाणारे कामगार त्याचप्रमाणे एखाद्या नोकरीच्या मुलाखतीला जाणारे कारवार, काणकोण भागांतील लोक नियोजित वेळी पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती झाली आहे. याला सर्वस्वी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते पर्यायाने सरकार जबाबदार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया काणकोणमधून उमटायला लागल्या आहेत.
राष्ट्रीय हमरस्ता 66 या नावाने परिचित असलेल्या या रस्त्याचे रूंदीकरण करमल घाटात करावी लागणारी वृक्षतोड आणि बिगरसरकारी यंत्रणेचा विरोध या कारणांमुळे अडकले असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम खाते आपल्या अंगावरील जबाबदारी झटकून टाकू पाहत आहे. जे लोक किंवा संस्था विरोध दर्शवितात त्यांना एकत्र बसवून सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आजवर प्रयत्न किती झालेत याचा लेखाजोगा द्यावा, अशी मागणी आता काणकोणचे जागरूक नागरिक करायला लागले आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यावर चार ते पाच विविध ठिकाणी मालवाहू वाहने अपघातग्रस्त झालेली आहेत, 16 चाकांची बरीच अवजड वाहने अडकून पडली आहेत आणि या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱयांची ससेहालपट होत असल्याच्या तक्रारी वाढायला लागल्या आहेत. समाजमाध्यमांवर याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
ठेकेदारावर कारवाईची मागणी
मध्यंतरी बाळ्ळी ते गुळेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण विरोधी गटाने केलेल्या आंदोलनानंतर फार मोठा गाजावाजा करून हायवे विभागाने सुरू केले होते, मात्र पावसाचे निमित्त करून हे काम अर्ध्यावरच सोडून देण्यात आले. हॉटमिक्स डांबरीकरण करतेवेळी रस्त्याच्या बाजूच्या कडा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे व पावसाळय़ात या ठिकाणी चिखल निर्माण झाल्यामुळे दुसऱया वाहनांला बाजू देताना या ठिकाणी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. त्यातच बार्से आणि अन्य काही भागांत दुपदरी रस्ता व पुलाचे बांधकाम दीर्घकाळानंतर पूर्ण करण्यात आले असले, तरी सर्वत्र खड्डे पडल्यामुळे आणि वाहतुकीला धोकादायक बनल्यामुळे बार्से येथील सदर रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे. ज्या ठेकेदाराने हे काम स्वीकारले होते त्याच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अपघातग्रस्त वाहनावर आणखी एक ट्रक कलंडला
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी करमल घाटात कोसळलेले एक मालवाहू वाहन बाजूला हटविण्यासाठी किमान 50 हजार रु. इतका खर्च अपेक्षित असून याच मालवाहू वाहनावर कारवारहून आलेले दुसरे मालवाहू वाहन कलंडण्याची घटना 14 रोजी घडली. आता हे वाहन बाजूला हाटविण्यासाठी वाहनमालकाला किमान 25 हजार रु. इतका खर्च येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे दरदिवशी अपघात घडत असल्यामुळे असुरक्षितता वाढीस लागली असून सार्वजनिक बांधकाम खात्याचा हायवे विभाग मात्र हात वर करून जनतेच्या भावनांशी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.