ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस मुंबईहून शिर्डीकडे जात होती.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. आज पहाटे या बसची आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील जवळपास 50 प्रवासी प्रवास करत होते. त्यामधील 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 प्रवाशी जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.