गोकाक येथील कुटुंबावर काळाचा घाला : मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : ओमानमध्ये झालेल्या वाहन अपघातात गोकाक येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह गोकाकला आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला आहे. सलालाहून मस्कतला जाताना झालेल्या अपघातात पवनकुमार मायाप्पा तहसीलदार, पूजा मायाप्पा तहसीलदार, विजया मायाप्पा तहसीलदार व त्यांचा नातेवाईक आदिशेष बसवराज या चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. चारही मृतदेह हायमा इस्पितळात ठेवण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री एस. जयशंकर व प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय दूतावासाकडून यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मिळाली आहे. खासदार इराण्णा कडाडी यांनी एकाच कुटुंबातील चौघा जणांच्या अपघाती मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.