किटवाडच्या अपघाती तरुणाचे उपचारादरम्यान निधन : ग्रामस्थांसह मित्रपरिवारही गहिवरला
कुदनूर / विनायक पाटील
पुण्यात नोकरी लागल्यानंतर पहिलीचवेळ हनुमान जयंतीसाठी गावाकडे येत असताना कोगनोळी टोल नाक्याजवळ १० एप्रिलला मोठा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी झालेल्या किटवाड (ता. चंदगड) येथील अंकुश नरसू पाटील (वय २९) या तरुणाला उपचारासाठी तत्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्यानंतर तब्बल तेवीस दिवस मृत्युशी झुंज सुरू झाली. मात्र, बुधवार दि. ४ मे रोजी उपचार सुरू असताना सायंकाळी अंकुशची प्राणज्योत मालवली आणि मृत्युशी झुंज थांबली. बरा होऊन घरी येईल अशी वाट पाहणार्या सर्वांनाच मोठा धक्का बसला. अन् देवही किती निर्दयी आहे अशी प्रत्येकजण वाचा करू लागला.
चंदगड तालुक्यात शेवटच्या टोकाला वसलेल्या किटवाड गावातील शेतकरी कुटुंबात अंकुशचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावात झाले. माध्यमिक शिक्षण होसूर येथे पूर्ण करून बी.कॉम पदवीचे शिक्षण कोवाड येथे घेतले. घरची हलाकीची परिस्थिती आणि भावंडात मोठा असलेला अंकुश नोकरीसाठी पुण्याला रवाना झाला. सुरुवातीला हॉटेलमध्ये अकौंटंट म्हणून नोकरी केली. त्यानंतर एका नामांकित कंपनीत अकौंटंट म्हणून नोकरीची पाच वर्षे पूर्ण केली. नोकरीतून कुटुंबाची परिस्थिती सुधारत लाखो रुपये खर्च करून घराचे स्वप्नही पूर्ण केले. घराचे स्वप्न पूर्ण करून आता आपल्या लग्नाचा विचार त्याने केला होता. मात्र, आई-वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा आणि दुचाकीवरून सारखं गावी येत जाऊ नको रे असे म्हणणार्या मित्र परिवारातील अंकुशची अखेर नशिबाने साथ सोडली. बुधवारी रात्री त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघाताच्या पाच मिनिटापूर्वी साधला होता संपर्क
पुण्यातून पहाटे ४ च्या सुमारास दुचाकीवरून तो निघाला होता. त्याने चुलत भाऊ महेशला कोल्हापुरात पोहोचल्याचे फोन करून कळविले. त्यानंतर पाचच मिनिटांनी त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. अन् अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या मदतकर्त्यांना त्याच्या फोनवरून घरच्यांना अपघाताची कल्पना दिली. अपघाताची घटना समजताच घरची मंडळी अंकुशकडे पोहोचली. अपघात गंभीर झाल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूरला तत्काळ हलविण्यात आले. उपचारात कळले की त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. यातच काही दिवस तो कोमात गेला. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातूनही तो बरा झाला. उपचाराला साथ मिळत होती पण शेवटच्या श्रणी निमोनिया झाला. अन् बरा होणारा अंकुश काळाच्या पडद्याआड गेला.
कोरोना काळात आरोग्य शिबिरासाठी धडपडला…
कोरोनासारख्या जागतिक आपत्तीत आपला गाव अडकणार नाही यासाठी ग्रामस्थांचे आरोग्य सुस्थितीत राहिले पाहिजे. यासाठी मित्र प्रेम ग्रुपने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरासाठी अंकुशने खूप धडपड केली होती. मात्र, दुसर्यांच्या आयुष्याची काळजी करणारा तसेच कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी होणारा आता आपल्यात नसल्याची खंत अन् हळहळ व्यक्त केली जात आहे.