मडकई आम्रेखाजन शेतकऱ्यांची मागणी : साडेतीन कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
मडकई येथील आम्रेखाजन शेतकरी कुळ संघटना समितीने सहा वर्षांचा हिशेब आदी द्यावा व नंतरच मामलेदारांनी नवीन समितीची निवड करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवारी आम्रेखाजन येथे मोठ्यासंख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी नवीन समिती निवडण्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे मामलेदार कार्यालयातून आलेल्या अव्वल कारकुनाला आल्या पावली माघारी जावे लागले.
आम्रेखाजन शेतकरी कुळ संघटना समितीने गेल्या सहा वर्षांचा जमा खर्च व हिशेबाचा तपशिल दिलेला नाही. समितीकडे साधारण ऊ. 1 कोटी 80 लाखांचा निधी शिल्लक होता. शिवाय गेल्या सहा वर्षांचा मानशेच्या पावणीचा हिशेब केल्यास किमान ऊ. 3 कोटी 50 लाख बँक खात्यात जमा असायला हवेत. त्यातील जमा-खर्चाचा ऑडिट अहवाल शेतकऱ्यांसमोर ठेवण्याची मागणी प्रेमानंद गावडे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना केली. आम्रेखाजन शेतीमध्ये मडकई भागातील साधारण सहाशे शेतकरी सदस्य आहेत. काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या तक्रारी मागील वर्षभरापासून मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. गेल्या महिन्यात शेतीच्या बांधाला पडलेले भगदाड अद्याप बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीत खारे पाणी घुसून यंदाच्या हंगाम पाण्यात गेला आहे. काही शेतकऱ्यांनी भाजी व मिरची लावली होती. हे पिकही धोक्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात मत्स्य उत्पादनासंबंधी मानशेची पावणी व्हायची होती, तिही झालेली नाही. या सर्व गोष्टी मामलेदारांनी आधी निकालात काढाव्यात तसेच समितीकडून मागील सहा वर्षांचा हिशेब सादर करावा व नंतरच नवीन समिती नियुक्त करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मडकईतील अधिकारी नेमल्याने आक्षेप
आम्रेखाजन शेतकरी कुळ संघटनेची नूतन समिती निवडण्यासाठी मामलेदारांनी नियुक्त केलेले अव्वल कारकुन हे मडकई भागातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर नूतन समिती निवडण्याची जबाबदारी सोपविल्याने शेतकऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. एक तर मामलेदारांनी स्वत: निवडणूक घ्यावी किंवा दुसरा अव्वल कारकुन या निवड प्रक्रियेसाठी नियुक्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.