2025 पर्यंत पूर्ण देश डॉप्लर रडारच्या कक्षेत असणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात हवामान विभागाचा अनुमान हळूहळू अचूक ठरत चालला आहे. खराब हवामानासंबंधीच्या पूर्वानुमानाच्या अचूकतेत मागील 8-9 वर्षांमध्ये सुमारे 40 टक्के सुधारणा झाली असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी काढले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) 148 व्या स्थापना दिनाला त्यांनी संबोधित केले आहे.
पूर्वानुमानात सुधारामुळे आपत्तीशी संबंधित मृत्यूदर कमी होत एकेरी आकडय़ात आला आहे. देशात हवामान विभागाची भविष्यवाणी आगामी काळात अधिक अचूक होणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.
देशात डॉप्लर रडारची संख्या 2013 मध्ये 15 इतकी होती. 2023 मध्ये हा आकडा आता 37 झाला आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये आणखी 25 रडार लावले जाणार असल्याने यांची एकूण संख्या 62 होणार आहे. 2025 पर्यंत पूर्ण देश डॉप्लर रडार नेटवर्कच्या कक्षेत येणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. आयएमडीने रविवारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चार डॉप्लर रडार (डीडब्ल्यूआर) कार्यान्वित केले आहेत.
या नव्या डॉप्लर रडार्समुळे पश्चिम हिमालयीन क्षेत्रात विभागाच्या हवामान देखरेख क्षमतांमध्ये वृद्धी होणार आहे. 4 डीडब्ल्यूआर जम्मू-काश्मीरमध्ये बनिहाल टॉप, हिमाचल प्रदेशात जोत आणि मुरारी देवी तर उत्तराखंडमध्ये सुरपुंडा देवीमध्ये स्थापन करण्यात आले आहेत.