खासदार शेट्टर यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली असून आता तातडीने भूसंपादनाची कार्यवाही करावी, तसेच बेळगाव-हुनगुंद-रायचूर या रेल्वेमार्गासाठीही प्रयत्न करावेत. शहरातील तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे बांधकाम अर्धवट असून ते तातडीने पूर्ण करण्याची सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा प्रशासनाला केली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रिंगरोडची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकर राबविण्याची सूचना त्यांनी केली.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी सोयीचा ठरणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल. त्याचबरोबर इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबविणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन व विविध विभागांनी एकत्रितरित्या या प्रक्रियेला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, राष्ट्रीय महामार्गाचे संचालक भुवनेश्वर कुमार, भूसंपादन अधिकारी चव्हाण, नैर्त्रुत्य रेल्वेचे विनयकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौभद्र, रेल्वेचे भूसंपादन अधिकारी मारुती ब्याकुड यांसह इतर उपस्थित होते.