रत्नागिरी/ प्रतिनिधी-
शहरात नुकतीच करण्यात आलेली तीन पत्ता जुगारावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या ठिकाणी जुगाराची घटना घडली त्या ऐवजी पोलिसांनी दुसरीच ठिकाणे गुन्ह्यामध्ये दाखल केले असून शहरातील अनेक बडी धेंडे या जुगारात सामील असताना भलतीच नावे गोवण्यात आल्याची कुजबुज शहर परिसरात सुरू आहे.
गणेशोत्सवात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जुगार खेळविला जात होता. नियमित पोच जात असल्याने आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असा समज जुगार आयोजकांना झाला. मात्र एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली या जुगारावर छापा टाकण्यात आला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे खळबळ उडाली.
जुगारात सामील होण्यासाठी २ लाख रूपये दाखवून आतमध्ये प्रवेश दिला जात होता. जुगाराच्या ठिकाणी २० ते २५ जण असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार याठिकाणी ४० ते ४५ लाख रूपयांची रोकड असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून छाप्यामध्ये जप्त रक्कम केवळ ४४ हजार रूपये इतकीच दाखवण्यात आली आहे.
त्यामुळे जुगाराच्या ठिकाणी असलेली मोठी रक्कम नेमकी गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच जुगाराच्या ठिकाणी काही बडी धेंडे देखील होती अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे. मात्र त्यांचे नाव या गुन्ह्यात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या जुगाराचे आयोजन करणाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचेही गर्ग यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे जुगाराचे आयोजन करणाऱ्या मुख्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले असल्याचेही गर्ग यांनी सांगितले आहे.