जिल्हय़ातून आतापर्यंत 14 जण तडीपार, कारवाईनंतरही अड्डे सुरूच, तडीपारीची मात्रा कितपत यशस्वी?
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. खासकरून कामगार व मध्यमवर्गीयांना आर्थिक संकटात लोटणाऱया मटका, जुगाराविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. केवळ जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून एफआयआर दाखल करण्यापेक्षा मटका, जुगार चालविणाऱयांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. आठ दिवसांत 14 जणांना तडीपार करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी या जोडगोळीने संपूर्ण जिल्हा ढवळून काढला आहे. आठवडाभरात मटका आणि जुगारी अड्डे चालविणाऱया 14 जणांना तडीपार करण्यात आले आहे. चिकोडी व बैलहोंगल प्रांताधिकाऱयांनी पोलीस अधिकाऱयांच्या प्रस्तावानुसार ही कारवाई केली आहे.
तडीपारीचे आणखी 15 प्रस्ताव
जिल्हय़ातील वेगवेगळय़ा प्रांताधिकाऱयांसमोर तडीपारीचे आणखी 15 प्रस्ताव आहेत. एक-दोन महिन्यात या प्रस्तावांवरही अंमलबजावणी होणार आहे. यासाठी पोलीस दलाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे साहजिकच गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. तडीपारीच्या कारवाईने जिल्हय़ातील गुन्हेगारी कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण एखाद्या गुन्हेगाराला तडीपार करण्यासाठी पोलीस दलाकडून प्रांताधिकाऱयांना प्रस्ताव पाठवावा लागतो. वारंवार समज देऊनही त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही तर अशा गुन्हेगारांबद्दल पोलीस अधिकारी प्रस्ताव तयार करतात. किमान त्याला तीन प्रकरणात तरी शिक्षा झालेली असावी, असा नियम आहे. मटका आणि जुगार प्रकरणात होणारी दंडात्मक शिक्षाही गुन्हाच मानला जातो. त्याच कागदपत्रांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार होतो.
यापूर्वी गुंडा कायद्याचा बडगा उगारला जायचा. एखाद्या गुन्हेगाराला गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत ठेवण्यासाठी पोलीसप्रमुखांकडून जिल्हा दंडाधिकाऱयांना प्रस्ताव जायचा. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी निर्णय घ्यायचे. गुंडा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश बजावल्यानंतर संबंधित गुन्हेगाराला अटक करून वेगवेगळय़ा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात येत होते. नंतरच्या काळात विशेष समितीसमोर गुंडा कायदाही तग धरू शकला नाही.
झटपट कारवाई म्हणून तडीपारीची कारवाई
आता झटपट कारवाईचा मार्ग म्हणून तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. बेळगाव शहरातील अलीकडची उदाहरणे पाहता तडीपारीच्या कारवाईला न्यायालयातून लगेच स्थगिती मिळते. त्यामुळे या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली जाते. न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर गुन्हेगार रिलॅक्स होतो. हा खेळ सुरूच आहे. अनेक वेळा गुंडा कायदा व तडीपारीचा बडगा दाखवून गुन्हेगारांकडून वसुली केली जाते. असे प्रकारही सुरू आहेत.
जिल्हा पोलिसांनी हाती घेतलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तडीपारीची कारवाई केल्यानंतर तरी मटका, जुगारावर आळा बसणार का? त्यासाठी पोलीस यंत्रणा काय करणार? हा खरा प्रश्न आहे. कारण, मटका आणि जुगार हे केवळ एखादे गाव किंवा एखाद्या शहरापुरते मर्यादित नाहीत. त्याचा विस्तार मोठा आहे. या व्यवहारातील आर्थिक उलाढालीही मोठय़ा आहेत. एकीकडे मटका, जुगारी अड्डय़ांवर छापे टाकले जातात. लगेच त्याच अड्डय़ावर व्यवहार पूर्ववत सुरू होतो. यावरून या कारवायांमध्ये गांभीर्य किती? असा प्रश्नही सामान्यांना पडतो.
…तर जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकते
केवळ कागदपत्रांची पूर्तता करून आपण काही तरी करतो आहोत, हे दाखविण्यासाठी केलेली कारवाई हा कधीच जालीम उपाय ठरत नाही. कारवाई करणाऱया अधिकाऱयांचा यामागील उद्देश प्रामाणिक असेल तरच गैरधंद्यांना थोडय़ा प्रमाणात तरी आळा बसतो. परत अड्डे चालविण्याचे धाडस तो अधिकारी तेथे असेपर्यंत गुन्हेगार करत नाहीत. उद्देशात खोट असेल, केवळ खिसा भरण्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा केला जात असेल तर जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.
बेळगाव शहर व उपनगरात सध्या मटका, जुगार जोरात सुरू आहे. ‘साहेब आमचे खास आहेत. त्यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकणार नाही’ असे सांगत अड्डेचालक राजरोसपणे आपले अड्डे चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाईच्या बातम्या वेळोवेळी वृत्तपत्रामधून वाचावयास मिळतात. मात्र, ते अड्डे पुन्हा कार्यरत असल्याचेही पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी या कारवायांना फारसे गांभीर्याने घेणे सोडून दिले आहे.
एखाद्या अड्डय़ावर कारवाई झाली की परत तो अड्डा सुरू होणार नाही, याची शाश्वती नाही. उलट नव्या दमाने अड्डेचालक कामाला लागलेले दिसून येतात. कारण ‘मैत्रीपूर्ण हितसंबंध’ जोपासले गेल्याची माहिती नागरिकांकडून मिळते. एकीकडे मटका, जुगार जोरात असतानाच दुसरीकडे या व्यवसायातील काही जणांचे तडीपारीचे प्रस्तावही तयार होत आहेत. यात किती कायदेशीर कारवाई केली जाते आणि किती हातमिळवणी केली जाते, हे पहावे लागेल.
तडीपार झालेली ‘चौदा रत्ने’
मिरासाब गंगाराम बागडी (रा. मदभावी), सदाशिव सत्याप्पा गोडमाले (रा. रड्डेरहट्टी), महादेव यल्लाप्पा कांबळे (रा. उगार बुदुक), रवि सुरेश शिंगे (रा. कोहळ्ळी), प्रदीप प्रकाश करडी (रा. ककमरी), अली मूर्तजा दादापीर चमनमलिक (रा. कुडची), साहेबहुसेन दादापीर चमनमलिक (रा. कुडची), नजीर हुसेन तांबोळी (रा. कुडची), लक्ष्मण वसंत पोळ (रा. चिंचली), अल्ताफ ऊर्फ अल्ताफहुसेन मेवेगार (रा. कुडची), चंद्रकांत शंकर वड्डर (रा. अकोळ), संजय चंद्रकांत पराकट्टी (रा. निपाणी), देमाप्पा मलकाप्पा मादर (रा. वक्कुंद), शब्बीर कासीमसाब विरापूर (रा. कित्तूर).