संयुक्त राष्ट्रसंघात विदेशमंत्र्यांचे प्रतिपादन ः दहशतवादाचे समर्थक वस्तुस्थिती लपवू शकत नाही
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या 77 व्या अधिवेशनाला संबोधित पेले आहे. या संबोधनादरम्यान त्यांनी थेट नामोल्लेख न करता चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. दहशतवादाचे कुठलेही रुप भारत सहन करणार नाही. दहशतवाद पोसणाऱयांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
कुणीही तोंडाची वाफ दवडून स्वतःचे कृत्य लपवू शकत नसल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘कलम 370’संबंधी केलेल्या वक्तव्याची यामागे पार्श्वभूमी होती. जम्मू-काश्मीरला हिंदूबहुल क्षेत्र करण्याचा कट रचला जात असल्याचे शाहबाज यांनी म्हटले होते. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला. भारताच्या या निर्णयामुळे या प्रश्नावर तोडगा काढणे अधिकच अवघड ठरल्याचा कांगावा शाहबाज शरीफ यांनी केला होता.
संयुक्त राष्ट्रसंघ गुन्हेगारांवर बंदी लादून दहशतवादाला प्रत्युत्तर देतो. युएन सुरक्षा परिषद 1267 समिती अंतर्गत दहशतवाद्यांवर बंदी घातली जाते. युएनएससीच्या 1267 समितीत राजकारण आणून संयुक्त राष्ट्राकडून घोषित दहशतवाद्यांचा बचाव करणारे देश स्वतःच जोखीम पत्करत आहेत. अशाप्रकारची कृती या देशांची प्रतिमा उंचावू शकत नसल्याचे म्हणत जयशंकर यांनी पाकिस्तान तसेच चीनला लक्ष्य केले आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांवर जागतिक बंदी घालण्याच्या प्रस्तावांना रोखले आहे.
दहशतवाद सहन करणार नाही
भारत कदापिही दहशतवाद सहन करणार नाही. दहशतवाद फैलावणाऱया आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱया देशांवर कारवाई व्हायला हवी असे जयशंकर म्हणाले. जगातील सर्वात लोकशाहीवादी देशातून 130 कोटी लोकांच्या शुभेच्छा घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर आलो आहे. भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा नवा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या विकासाबद्दल कटिबद्ध असल्याचे उद्गार विदेशमंत्र्यांनी काढले आहेत. भारताचे लक्ष आता ग्रीन ग्रोथ, ऍक्सेसबल हेल्थवर आहे. जग कोरोनानंतर आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. इंधन, खतं अणि अन्नधान्यावरून संकट निर्माण झाले आहे. युक्रेन संकटामुळेही अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत शांततेचा पुरस्कर्ता
युक्रेन संघर्षावरून आम्हाला कुणाच्या बाजूने आहात अशी विचारणा केली जाते आणि आमचे उत्तर प्रत्येकवेळी स्पष्ट आणि प्रामाणिक असते. भारत हा शांततेच्या बाजूने आहे. चर्चा आणि कूटनीतीलाच एकमात्र मार्ग मानणाऱयाच्या बाजूने आम्ही आहोत असे जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करत म्हटले आहे.
जी-20चे अध्यक्षत्व
जी-20चे अध्यक्षत्व स्वीकारल्यावर आम्ही विकसनशील देशांसमोरील समस्यांचा मुद्दा उपस्थित करणार आहोत. अन्नधान्य आणि इंधनसुरक्षा तसेच हवामान बल हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. भारत जी-20 संघटनेसोबत अन्न तसेच ऊर्जासंकट रोखण्यावर काम करणार आहे. तर दहशतवादविरोधी समितीचा सदस्य असल्याने भारत दोन बैठकांचे आयोजन करणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
शेजारी देशांना भरीव मदत
भारत युक्रेन संकटासोबत स्वतःच्या शेजारी देशांमधील संकटावर उपाययोजना करत आहे. कोरोना संकटासोबत आम्ही शेजारी देशांमध्ये आर्थिक संकट पाहत आहोत. भारताने अफगाणिस्तानला औषधे पुरविली, तर श्रीलंकेला कोटय़वधी डॉलर्सची मदत केली आहे. म्यानमारला अन्नधान्य तसेच इतर पद्धतींनी मदत केली आहे. आम्ही आमच्या शेजारी देशांच्या सहाय्यासाठी प्रतिबद्ध आहोत असे उद्गार त्यांनी काढले आहेत.