शिक्षणमंत्र्यांचे आदेश : बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी शाळांमधील शिक्षक बऱयाचवेळा शाळांमध्ये वेळेवर हजर होत नसल्याची तक्रार पालकांकडून होत होती. त्यामुळे अशा वेळेत न येणाऱया शिक्षकांवर यापुढे कारवाई केली जाणार असल्याचे संकेत राज्याचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शनिवारी बेळगावमध्ये दिले. तसेच यापुढे शिक्षकांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही शिक्षक सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. काही शिक्षक शाळेत वेळेवर हजर नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश असूनही नियमित शाळा सुरू झाल्यानंतरच काही शिक्षक उपस्थित रहात असल्याचे दिसून येत आहे.
शहरासोबतच ग्रामीण भागातील काही शिक्षक शाळेवर उशिराने पोहोचत असल्याने त्याचा परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे यापुढील काळात शिक्षकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. यासाठी अनुदानही मंजूर केले जाणार आहे. यामुळे शिक्षक शाळेवर केव्हा दाखल होतात व केव्हा निघून जातात याची माहिती शिक्षण विभागाला होणार आहे.
दुर्गम भागातील काही शाळांमध्ये वेळेवर शिक्षक पोहोचत नाहीत. तसेच वेळेपूर्वी शाळा सोडल्या जातात. अशा अनेक तक्रारी होत्या. याची दखल घेत बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामचुकार शिक्षकांवर आता शिक्षण विभागाची नजर असणार आहे.