प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात कचऱ्याची समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे बंद करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, चायनिज गाडे, हातगाडे, फळगाडे, भाजीपाल्याचे गाडे अशा सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. उघडय़ावर कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर घनकचरा अधिनियम 2016 व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरि अधिनियम 1965 नुसार कायेदशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात टाकण्यात येणारा कचरा पालिकेच्यावतीने उचलला जातो. काही लोक जाणीवपूर्वक उघड्यावर कचरा टाकतात. असा कचरा टाकणे बंद करण्याच्या अनुषंगाने पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी बुधवारी हॉटेल्स व्यवसायिक, चायनीज गाडे, हातगाडे, फळगाडे, भाजी गाडे यांना नोटीसा बजावली आहे. त्यांनी काढलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आपल्या व्यवसायातून दैनंदिन निर्माण होणारा ओला व सुका कचरा आपल्या नजिकच्या गटारात अथवा इतरत्र टाकत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. इतरत्र टाकत असलेल्या कचऱ्यामुळे मुख्य रस्त्यावरील येजा करणाऱ्या नागरिकांना तसेच आसपास व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना कचऱ्याच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण करणारी आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा इतरत्र कुठेही न टाकता पालिकेच्या घंटागाडीत टाकावा. उघडयावर कचरा टाकताना आढळून आल्यास संबंधितांवर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या अधिनियमानुसार आपणावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा : निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी, शिवेंद्रसिंहराजेंची टीका